Tuesday, September 8, 2009

अयोध्याकांड - भाग ११

भरत निराश होऊन अयोध्येला परत निघाला. त्याच्या परतीच्या प्रवासाच्या वर्णनांत मंदाकिनी ओलांडल्याचा उल्लेख आहे पण यमुना ओलांडल्याचा मात्र नाहीं! त्याशिवाय तो भरद्वाजाच्या आश्रमात पोचला (कसा?) येथे नद्या ओलांडण्याच्या वर्णनात थोडी विसंगति दिसते. तेथून पुढे अयोध्येच्या वाटेवर गंगा ओलांडल्याचा मात्र उल्लेख आहे! भरताला अयोध्या भकास दिसली आणि तेथे न थांबतां तो पूर्वेकडे नंदिग्रामाला पोचला. हे अर्थातच हल्ली ममता बानर्जीमुळे गाजलेले नंदिग्राम नव्हे. ते दूर गंगेच्या मुखाशी आहे. रामायणातील नंदिग्राम अयोध्येच्या जवळच होते. त्यामुळे थेथे राहून भरताने १४ वर्षे राज्य चालवले. यानंतर रामायणाच्या जवळजवळ अखेरीपर्यंत भरताचा उल्लेख येत नाही. सीताहरणाच्या वृत्तान्त त्याचेपर्यंत पोचलाच नाही त्यामुळे रामाच्या मदतीला अयोध्येचे सैन्य धावून गेले नाहीं.
यानंतर राम चित्रकूट सोडून पुढे गेला. मात्र चित्रकूटावर किती काळ राहिला याचा स्पष्ट उल्लेख नाहीं पण दीर्घकाळ राहिला असेहि म्हटलेले नाही. खुद्द चित्रकूट तीर्थात मात्र रामाने वनवासाचा बराचसा काळ तेथे काढला अशी ठाम समजूत आहे, ती खरी दिसत नाही. भरत गेल्यानंतर अनेक ऋषि चित्रकूट सोडून चालले असे रामाला दिसले. रामाच्या चित्रकूटावर राहण्य़ामुळे आपल्यामागे राक्षसांचा ससेमिरा लागेल अशी त्यांना बहुधा धास्ती वाटत असावी. रावणाचा भाऊ खर राक्षस याने ’जनस्थाना’तून सर्व तापसांना घालवून लावले होते असे म्हटले आहे पण हे जनस्थान कोठे होते याचा उल्लेख नाही. पत्नीसह राम चित्रकूटावरच राहिला तर धोका असल्यामुळे मुख्य तापसी निघून गेले त्याना राम थोपवू शकला नाही. ज्यांचा रामावर विश्वास होता ते राहिले. रामानेहि विचार केला कीं येथेच राहिलो तर माता, भरत, अयोध्यावासी यांच्या आठवणी येतच राहतील. भरताच्या ससैन्य मुक्कामामुळे या मुलखाचीहि फार हानि झाली आहे तेव्हां आपणही चित्रकूट सोडून जावे. हे रामायणातील स्पष्ट उल्लेख असे निश्चितच दर्शवतात कीं भरत गेल्यावर पावसाळ्यापूर्वीच राम चित्रकूट सोडून गेला. अकरा वर्षे खासच राहिला नाही जसे चित्रकूटात मानले जाते!
रामायण पुढे म्हणते कीं चित्रकूटावरून राम निघाला तो अत्रि ऋषींच्या आश्रमाला पोचला. कोणत्या मार्गाने वा किती प्रवास करून पोचला हे काहीच सांगितलेले नाहीं. अत्रिऋषीनीं रामाचा सत्कार केला उपदेश केला. अनुसूयेने सीतेकडून सर्व हकीगत समजावून घेतली. येथे सीतेने तिला सांगितलेल्या पूर्वेतिहासांतहि कांही विसंगति दिसतात. सीता म्हणाली ’मी विवाहयोग्य झाले म्हणून पित्याने माझे स्वयंवर मांडले. शिवधनुष्य सज्ज करण्याचा पण होता. कोणाही राजाला धनुष्य पेलले नाही व ते सारे परत गेले. त्यानंतर दीर्घ काळाने रामलक्ष्मण मिथिलेला आले.’ राम मिथिलेला आला तेव्हां जेमतेम १६ वर्षांचा होता. व लगेच त्याचा व सीतेचा विवाह झाला तेव्हां त्यावेळी सीताहि फारतर १२-१३ वर्षांची असणार! मग तिचे पूर्वीचे स्वयंवर दीर्घ काळापूर्वी जनकाने कसे योजले असेल? तेव्हां तर ती अगदींच बालिका असणार, विवाहयोग्य खासच नसणार!
अत्रिऋषींचा निरोप घेऊन राम निघाला तो पुढे गेला तो मुलूख ’राक्षसांचा उपद्रव होणारा’ असा वर्णिला आहे. मात्र पुढील प्रवासाचे वर्णन वा भौगोलिक संदर्भ मुळीच सांगितलेले नाहीत.
येथे अयोध्याकांड संपले. रामाच्या यापुढील प्रवासाचा विचार पुढील कांडांच्या संदर्भांत करावयाचा आहे. भौगोलिक संदर्भांच्या बाबत आणखी एका गोष्टीचा उल्लेख करून विषय संपवूं. जिला सध्या अयोध्या म्हणतात तीच रामायणातील अयोध्या काय? अशीहि एक शंका घेतली जाते! वाचनात आलेल्या एका अभ्यासपूर्ण पुस्तकांत उत्तरकांडातील एका श्लोकाचा संदर्भ देऊन लेखकाने म्हटले आहे कीं अयोध्येपाशीं शरयू नदी ही पश्चिमवाहिनी असल्याचे रामाने सीतेला (पुष्पकविमानातून) दाखवले. प्रत्यक्षात अयोध्येपाशी शरयू दक्षिणवाहिनी व अयोध्येच्या पश्चिमेस आहे! लेखकाने असे दाखवून दिले आहे कीं शरयू हिमालयभागात प्रथम पश्चिमवाहिनी असून मग ती एका खिंडीतून खाली मैदानी भागात उतरते. मग रामायणातील अयोध्या हिमालयात शरयूच्या पश्चिमवाहिनी भागाच्या काठावर होती कीं काय?
अयोध्याकांडातील रामकथा मुख्यत्वे आपल्या मनातील रामकथेशी जवळपास जुळणारी आहे. मात्र काही घटनांवर, भौगोलिक व कालवाचक संदर्भांवर व व्यक्तिमत्त्वांवर मूळ रामाय़ण चिकित्सकपणे वाचले असतां कांही नवीन प्रकाश जरूर पडतो व शंकास्थळे नजरेला येतात. त्यांचे थोडेफार दर्शन घडवण्याचा माझा हेतु साध्य झाला असावा असे वाटते.

Thursday, August 6, 2009

अयोध्याकांड - भाग १०

चित्रकूटावर रामलक्ष्मणांना भरताच्या सैन्याची चाहूल लागली तेव्हा रामाच्या सूचनेवरून लक्ष्मणाने झाडावर चढून पाहिले व अयोध्येचे सैन्य असे ओळ्खून, ’हा भरत आला आहे.त्याचा हेतु काय?’ असा संशय व्यक्त करून त्याने रामाला सावध केले. रामाने मात्र, ’भरत मला प्रिय आहे, त्याला उगाच कठोर बोलू नको’ असे त्याला बजावले. सैन्य व इतरांना मागे ठेवून भरत एकटाच रामाचा आश्रम शोधत पुढे आला. वनात फिरताना वाट चुकू नये म्हणून लक्ष्मणाने झाडांना खुणेसाठी बांधलेली वस्त्रे त्याला दिसली, त्यांच्या सहाय्याने तो रामाच्या पर्णशालेत पोचला. तेथे त्याला अनेक शस्त्रे व धनुष्ये दिसली.
राम-भरतभेटीबद्दल आपणाला सविस्तर माहिती आहे. ’तूं वनांत कां आला आहेस’ असे विचारल्यावर भरताने दशरथ मृत्यु पावल्याचे सांगितले. भरताने रामाला अयोध्येला परतून राज्य स्वीकारण्यासाठी परोपरीने विनवले. वसिष्ठानेहि कुलपरंपरा सांगितली मात्र ’मला वनवास व भरताला राज्य या पित्याच्या स्वच्छ आज्ञा आहेत व त्या मी मोडणार नाही, आता पित्याच्या मृत्यूनंतर तर वनवास आटोपल्यावरहि अयोध्येस येण्यास माझे मन घेणार नाही’ असे राम म्हणाला. भरताने ’पित्याची चूक तूं दुरुस्त कर, त्याला अंतकाळीं भ्रम झाला, मी ज्येष्ठ पुत्र नसताना राज्य कसे स्वीकारूं?’ असे अनेक युक्तिवाद केल्यावर येथे प्रथमच रामाने, दशरथाने कैकेयीच्या पित्याला विवाहसमयीं दिलेल्या वचनाचा उल्लेख केला. ही गोष्ट राम सोडून इतर कोणाला, वसिष्ठालाहि माहीत नव्हती. रामाला कशी माहीत होती? कधीतरी दशरथाच्या तोंडूनच रामाला ही गोष्ट कळली असली पाहिजे. पण मग सत्यवचनी म्हटला जाणारा राम, पित्याच्या इच्छेप्रमाणे अभिषेक करून घेण्यास कसा तयार झाला होता? त्याने पित्याला विरोध केला नाही वा त्याच्याच वचनाची आठवणही करून दिली नाही. ’माझे मन बदलत नाही व भरत दूर आहे तोवरच तू अभिषेक करून घे, सांभाळून रहा, तुला धोका आहे’ असें दशरथ म्हणाला तेव्हांही रामाने प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. हे सत्यवचनी व भरतप्रेमी या रामाच्या लौकिकाशी मुळीच सुसंगत नाही.
रामाने भरताची समजूत घातली. ’१४ वर्षे संपेपर्यंत मी परत येणार नाही व राज्य तुलाच संभाळावे लागणार आहे, कौसल्या सुमित्रा यांची काळजी घे, कैकेयीलाही शासन करूं नको’ वगैरे उपदेश केला. राम ऐकत नाही असे पाहून ऋषींनी भरताला परत फिरण्यास सांगितले. नाइलाजाने रामाच्या पादुका घेऊन भरत परत निघाला. ’मीहि १४ वर्षे राजधानी बाहेरच राहीन व पादुकांच्या आधारे राज्य सांभाळीन, १४ वर्षे पूर्ण होतांच तुम्ही दिसलां नाहीं तर प्राणत्याग करीन’ असे रामाला म्हणाला.
या सर्व प्रसंगांत भरताचे थोर मन फारच उठून दिसते. आपल्याला राज्य मिळण्यात मोठा अन्याय झालेला नाही हे दिसल्यावरही त्याने राज्याचा लोभ केला नाही. रामाने भरताला वडील भाऊ या नात्याने उपदेश करणे वगैरे ठीक आहे पण एक गोष्ट विसरून चालणार नाही कीं राम भरतापेक्षां कांही तासांनीच मोठा होता! तेव्हां तारतम्य सोडून चालणार नाही. मुळात रामाने पित्याच्या इच्छेप्रमाणे राज्य स्वीकारण्याचे ठरवले होते पण कैकेयीने दशरथाला कोंडींत पकडल्याचे दिसल्यावर त्याने पित्याची सुटका केली व एकदां आपला राज्यावर हक्क नाही हे मान्य केल्यावर मात्र तो ठाम राहिला हे खरे.
पुढील भागामध्ये अयोध्याकांडाची अखेर गांठावयाची आहे.

Thursday, July 16, 2009

अयोध्याकांड - भाग ९

आईचा धि:कार करून भरत बाहेर पडला तो कौसल्येला भेटला. तिने झाल्या गोष्टीबद्दल भरताला दोष दिला तो मात्र नाकारून ’मला काहीच माहीत नाही’ असे त्याने म्हटले. रात्र होईपर्यंत इतर कोणीच भरताला भेटले नाही. त्यामुळे तो आल्याचेहि कोणाला कळले नाही. दुसर्‍या दिवशी दशरथाच्या प्रेताचे दहन होऊन मग तेरा दिवस सर्व उत्तरक्रिया झाली. दूत केकय देशाला जाऊन मग भरत आला त्यांत १२-१३ दिवस गेले होते. त्यामुळे दशरथाच्या मृत्यूनंतर २४-२५ दिवसांनी भरताला राज्य स्वीकारण्याचा आग्रह सुरू झाला. त्याने ठाम नकार दिला. रामाला परत बोलावण्यासाठी स्वत:च त्याच्या भेटीला जाण्याचा बेत त्याने केला. भरत ससैन्य व कुटुंबीय व मंत्र्यांसह जाणार असल्यामुळे अयोध्येपासून गंगाकाठापर्यंत नवा रस्ता बनवला गेला! त्याचे खुलासेवार वर्णन केले आहे. त्यासाठी किती दिवस लागले ते सांगितलेले नाही. रामाने गंगा ओलांडली त्यानंतर सुमंत्र परत जाणे, दशरथनिधन, दूतप्रवास, भरतप्रवास, उत्तरक्रिया, प्रवास तयारी व भरताचा गंगाकाठापर्यंत प्रवास यांत एक महिन्याहून जास्त काळ गेला असे दिसते. गंगाकिनार्‍यावर भरतही गुहकालाच भेटला. त्याला प्रथम भरताच्या हेतूबद्दल शंकाच आली. पण भरताने त्याची खात्री पटवली. मग त्याने ५०० नौका जमवून सर्व लवाजम्यासकट भरताला गंगापार केले. भरत प्रयागात भारद्वाज आश्रमात जाऊन त्याना भेटला. त्यानाहि प्रथम भरताच्या ससैन्य वनात येण्याच्या हेतूबद्दल शंकाच वाटली. (एकटा लक्ष्मणच शंकेखोर नव्हे!) मात्र नंतर भरताच्या बोलण्यावरून खात्री पटून ’राम-लक्ष्मण-सीता चित्रकूटावर आहेत’ अशी माहिती त्यानी भरताला दिली. एक रात्र गंगातीरावर मुक्काम करून मग सर्वजण चित्रकूटाकडे निघाले. चित्रकूट यमुनेच्या दक्षिणेला असताना, भरताने यमुना ओलांडल्याचा उल्लेख नाही. चित्रकूटाच्या उत्तरेला मंदाकिनी नदी असल्याचे वर्णन आहे. पण रामाने वा भरताने मंदाकिनी ओलांडल्याचा उल्लेख नाही. ही मंदाकिनी कोणती? हिमालयामध्ये अलकनंदा व मंदाकिनी या नद्या आहेत ती मंदाकिनी अर्थातच ही नव्हे. इतरत्र वाचावयास मिळाले व विकिमॅपियावर एक नकाशा पहावयास मिळाला त्यावरून मध्यप्रदेशात एक मंदाकिनी नावाची नदी आहे व ती अलाहाबादच्या वरच्या बाजूला काही अंतरावर यमुनेला मिळते. तिच्या आग्नेयेला चित्रकूट हे तीर्थक्षेत्र आहे व ते मंदाकिनीच्या किनारी आहे. त्यामुळे यमुना प्रयागपाशी ओलांडली तर चित्रकूटाच्या वाटेवर मंदाकिनी ओलांडावी लागणार नाही. रामायणात चित्रकूट प्रयागापासून दहा कोस दूर असल्याचे भरद्वाजानी रामाला म्हटले आहे. प्रत्यक्षात चित्रकूट प्रयागपासून १०० पेक्षा जास्त मैल, जबलपूर-अलाहाबाद रेल्वे मार्गापासून बांद्याकडे जाणार्‍या रेल्वेफाट्यावर कारवी नावाच्या स्टेशनच्या जवळ आहे. तेच रामाच्या वस्तीने पावन झालेले रामायणातील चित्रकूट असे मानले जाते. तेव्हां भरद्वाजाने रामाला सांगितलेले अंतर सपशेल चुकलेले होते असे म्हणावे लागते.
या चित्रकूटाबद्दल थोडी ऐतिहासिक माहिती सांगण्याचा मोह आवरत नाही. रघुनाथराव पेशव्याला बारभाईनी पदच्युत केले. त्याचा बाजीराव हा औरस पुत्र व अमृतराव हा आधीचा दत्तक पुत्र. सवाईमाधवरावाच्या मृत्यूनंतर यांतील कोणालाच पेशवाई मिळू नये यासाठी नाना फडणिसाने नाना प्रयत्न केले. तरी अखेर बाजीरावच पेशवा झाला. अमृतराव त्याचा कारभारी झाला व तो फार कर्तबगार आहे असे इंग्रजांचे मत होते. पण बेबनाव होऊन अखेर सालिना आठ लाखाची जहागीर देऊन त्याला इंग्रजानी वाराणसीला पाठवले. तेथेच त्याची अखेर झाली. त्याचा पुत्र विनायकराव जहागीर संभाळून होता. तो नंतर चित्रकूटाला गेला. त्याच्या संस्थानाला कारवी संस्थान म्हणत. १८५३ मध्ये तो वारला. १८५७ पर्यंत संस्थान चालले. बंडात सामील असल्याचा खोटा आळ घेऊन इंग्रजांनी संस्थान खालसा केले व कारवीची प्रचंड प्रमाणावर लूट केली.

Wednesday, July 1, 2009

अयोध्याकांड - भाग ८

अयोध्येहून निघालेले दूत ४-५ दिवसांत कैकय देशाच्या राजधानीला पोंचले. त्यांच्या प्रवासमार्गाचे विस्तृत वर्णन केलेले आहे. प्रथम मालिनी नदी व नंतर हस्तिनापुरापाशी गंगा ओलांडली, पांचाल व कुरुजांगल देश ओलांडला असे म्हटले आहे. यमुना ओलांडल्याचा उल्लेख नाही. यानंतर इतरहि नद्या, इक्षुमती व विपाशा ओलांडल्याचे वर्णन आहे व मग ते राजधानीला पोचले तिचे नाव गिरिव्रज असे दिले आहे. महाभारतातहि एक गिरिव्रज आहे. ती जरासंधाची राजधानी होती. डोंगरांनी वेष्टिलेली म्हणून तिचे नाव गिरिव्रज. पण महाभारतातील गिरिव्रज म्हणजे पाटणा अशी माझी समजूत आहे. तें हें नव्हे. गंगा सोडून इतर नद्यांचीं जुनी नावे परिचित नसल्याने हे केकय देशातील गिरिव्रज कोठे होते त्याचा नीट उलगडा होत नाही.
दूतांना आज्ञा होती कीं भरताला दशरथ मृत्यु पावल्याचें कळूं द्यावयाचे नाहीं, लगेच अयोध्येला बोलावले आहे एवढेच सांगावयाचे. निरोप मिळाल्यावर पितामहांची परवानगी घेऊन भरत लगेच मंत्र्यांसह अयोध्येस निघाला. त्याचेबरोबर अनेक भेटी, संपत्ति व सैन्य असल्यामुळे त्याला प्रवासाला वेळ लागला. शत्रुघ्न व या दोघांच्या बायका बरोबर होत्या काय? खुलासा नाही. मुळात त्या केकय देशाला गेल्याचाच कोठे उल्लेख नाही पण कित्येक वर्षे भरत आणि शत्रुघ्न केकय देशालाच होते तेव्हां सुरवातीला ते दोघे गेले तेव्हां त्या कदाचित वयाने लहान असल्याने गेल्या नसल्या तरी पुढे केव्हां तरी गेल्याच असणार. एकूण रामायणात त्या नगण्यच आहेत. या परतीच्या प्रवासाचेहि विस्तृत वर्णन आहे. मात्र त्यावरूनहि कैकेय देश कोठे होता त्याचा उलगडा होत नाही. अनेक नद्या ओलांडून भरत यमुनेपाशी आला पण यमुना ओलांडल्याचा उल्लेख नाही. नंतर तो गंगा व गोमती ओलांडून अयोध्येला आला. केकय देश यमुनेच्या पश्चिमेला, दक्षिणेला कीं गंगायमुनांच्या मधल्या अंतर्वेदीत हे कळत नाही, कारण यमुना दोन्ही वेळा ओलांडलेली नाही! तेव्हां यमुनेच्या पूर्वेलाच पण बराच उत्तर भागांत असावा एवढेच म्हणतां येईल. अयोध्येजवळ आल्यावर सर्वांना मागे ठेवून भरत एकटाच अयोध्येत शिरला. या प्रवासाला आठ दिवस लागले असे म्हटले आहे. भरत सरळ पित्याच्या भवनात गेला व तेथे पिता नसल्यामुळे कैकेयीमातेच्या भवनात शिरला.
दशरथाचा मृत्यु झाला व एकहि पुत्र जवळ नसल्यामुळे त्याची उत्तरक्रियाही झाली नव्हती आणि त्यामुळे भरताला तातडीने बोलावले होते. पण त्याच्या येण्याची खबर मंत्र्यांना वा वसिष्ठाला लगेच मिळण्याची कोणतीच व्यवस्था केलेली नव्हती असे दिसते. हे जरा चमत्कारिकच वाटते. कोणालाही भरत आल्याची बातमी कळण्याआधी तो सरळ कैकेयीलाच भेटला. राम-लक्ष्मण-सीता वनात गेल्याची व पिता दशरथ मृत्यु पावल्याची हकीगत भरताला मातेकडून कळली. कैकेयी-भरत संवादाबद्दल आपणाला माहीतच आहे.त्यामुळे लिहिण्याची गरज नाही. यावेळीहि, ’दशरथाने पूर्वीच केकयनरेशाला दिलेल्या वचनाप्रमाणे तुझाच राज्यावर हक्क होता व तोच मी मागितला’ असे कैकेयी भरताला म्हणत नाही. तिला त्या वचनाबद्दल माहितीच नसावी असे स्पष्ट दिसते.

Thursday, June 11, 2009

अयोध्याकांड - भाग ७

रामाने निरोप दिल्यावर सुमंत्र गुहकाजवळ, राम कदाचित बोलावील या आशेने काही दिवस थांबून राहिला होता. राम भरद्वाज आश्रमाला पोचल्याची बातमी गुहकाच्या हेरांनी सांगितल्यावर निराश होऊन तो अयोध्येला परत गेला. तो रामाशिवायच परत आलेला पाहून राम खरेच वनात गेला अशी खात्री होऊन दशरथ मूर्च्छित झाला. मग ’मला रामाकडे ने’ असे सुमंत्राला विनवू लागला. राम वनात जाऊन पांच रात्री उलटल्या असे यावेळी कौसल्या म्हणाली यावरून सुमंत्र गुहकापाशी एखददुसराच दिवस राहिला असावा. दशरथ, कौसल्या शोकमग्न झालीं. दशरथाने यावेळी श्रावणाची कथा सांगून त्याच्या पित्याचा शाप मला भोवतो आहे असे म्हटले. मात्र श्रावणाचा जन्म वैश्य पिता व शूद्र माता यांचेपासून असल्याचे दशरथ म्हणाला. हा खुलासा मुद्दाम करण्याचे कारण दशरथाला ब्रह्महत्येचे पातक लागलेले नव्हते हे स्पष्ट करणे हेच असावे. त्यामुळे दशरथाचा गुन्हा थोडा सौम्य ठरला! विलाप करीतच मध्यरात्री दशरथ मरण पावला. हा प्रसंग कौसल्येच्या महालात घडला व सुमित्राही तेथेच होती पण कैकेयीचा उल्लेख नाही. कौसल्या, सुमित्रा अर्धवट शुद्धीत होत्या त्याना दशरथ मेल्याचे कळलेहि नाही. जणू तो बेवारशासारखा मरण पावला! कैकेयीला काहीच कळले नव्हते. दुसरे दिवशी राण्या, मंत्री, वसिष्ठमुनि, प्रजाजन सर्व शोकमग्न झाले. एकहि पुत्र जवळ नसल्याने दशरथाचे शव तेलाने भरलेल्या द्रोणीत ठेवले. (आजकाल मॉर्गमध्ये ठेवतात तसे!). मार्कंडेय ऋषीनी वसिष्ठाना म्हटले की कोणाही राजवंशातील व्यक्तीला अभिषेक करा. तें न मानून वसिष्ठाने पांच दूत भरताकडे शीघ्र पाठवले. यापुढील हकिगत पुढील भागात पाहूं.

Tuesday, May 12, 2009

अयोध्याकांड - भाग ६

सुमंत्र रथात राम-लक्ष्मण-सीता यांना घालून निघाला तो संध्याकाळी तमसातीरावर पोंचला. पाठोपाठ आलेल्या नगरवासीयांचा रामाला परत येण्याचा आग्रह चालूच होता. पहाटे रामाने सुमंत्राला एकट्याला रथ घेऊन उत्तर दिशेला पाठवले व काही वेळाने दुसर्‍या वाटेने परत येण्यास सांगितले. प्रजाजनांचा गैरसमज होऊन ते रथामागोमाग गेले व रथ परत आल्यावर त्यांत बसून राम, लक्ष्मण, सीता दक्षिण दिशेला वनाकडे निघाले. दुसर्‍या रात्रीपर्यंत रथ गंगातीराला पोंचला. गुहकाची भेट होऊन पुढील दिवशीं त्याने रामाला गंगापार केले. सुमंत्राची रथासह रामाबरोबर राहण्याची इच्छा होती पण ’तूं परत गेल्याशिवाय कैकेयीची खात्री पटणार नाही’ असे समजावून रामाने त्याला गंगातीरावरूनच परत पाठवले. आतां तिघेंच वनांत राहिलीं. या वेळी प्रथमच रामाने कैकेयीबद्दल कडवट शब्द उचारले व ’कैकेयी तुझ्या-माझ्या मातेला विषही देईल’ अशी भीति लक्ष्मणापाशी व्यक्त केली. लक्ष्मणाने त्याला समजावले.
रामाने गंगा कोठे ओलांडली? गंगा ओलांडून तो गंगा-यमुनांच्या संगमाजवळ भरद्वाज मुनींच्या आश्रमात पोचला असे म्हटले आहे. तेव्हा हा आश्रम (प्रयाग)अलाहाबादजवळ संगमापाशी यमुनेच्या उत्तरेला असला पाहिजे कारण यमुना ओलांडलेली नव्हती. आश्रम संगमाजवळ असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. भरद्वाजांनी स्वागत करून येथेच रहा असे म्हटले पण हा प्रदेश अयोध्येच्या जवळच तेव्हां तें न मानतां भरद्वाजांच्याच सल्ल्याने तेथून दहा कोस अंतरावर चित्रकूट पर्वतावर जाण्याचे ठरले. दुसरे दिवशी भरद्वाजानी चित्रकूटाला जाण्याचा मार्ग समजावून सांगितला त्यांत यमुना ओलांडण्यास सांगितले. त्यावरून चित्रकूट यमुनेच्या दक्षिणेला पण जवळपासच होता असा समज होतो. येथपर्यंत रामाचा प्रवासमार्ग रामायणावरून बराचसा कळतो. यांनंतरचे प्रवासवर्णन भौगोलिक दृष्ट्या धूसरच आहे. यमुना ओलांडण्यासाठी सुकलेल्या बांबूंची नौका वा तराफा लक्ष्मणाने बनवला. त्या रात्री यमुनेच्या तीरावर राहून दुसर्‍या दिवशी चित्रकूटाला पोचले. तेथे वाल्मिकीचा आश्रम होता. त्याचे जवळच लक्ष्मणाने कुटी बनवली. येवढ्या प्रवासामध्ये ४-५ दिवस गेले. भरत येऊन भेटेपर्यंत राम येथेच राहिला. चित्रकूट प्रयागपासून जवळच असावा अशी समजूत होते. त्याबद्दल प्रत्यक्ष परिस्थिती पुढे पाहूं.

Wednesday, April 15, 2009

अयोध्याकांड - भाग ५

सर्व रात्र कैकेयीच्या विनवण्या करण्यात गेली पण कैकेयीने आपल्या मागण्या मागे घेतल्या नाहीत. संपूर्ण नाइलाज झाल्यामुळे रात्र संपल्यावर दशरथाने रामाला बोलावण्याचे ठरवले. सुमंत्र आल्यावर कैकेयीनेच त्याला पाठवून रामाला बोलावून घेतले. तो आल्यावर दशरथाला काहीच बोलवेना तेव्हां कैकेयीनेच रामाला सांगितले कीं ’ते तुला स्वत: सांगणार नाहीत पण तू ताबडतोब १४ वर्षांसाठी वनात जायचे आहेस व राज्य भरताला मिळायचे आहे.’ रामाने ताबडतोब मान्य केले व म्हटले ’मी तुझ्या आज्ञेनेच सर्वस्व त्यागीन मग राजाला कशाला त्रास दिलास?’ कैकेयीने त्यावर म्हटले कीं ’तूं खुषीने राज्य सोडून वनात गेल्याशिवाय महाराज स्नान वा भोजन करणार नाहीत.’
यापुढील प्रसंग आपणाला परिचित आहेत. सीता व लक्ष्मण रामाबरोबर वनात जाण्याचा आग्रह धरतात व राम तें मान्य करतो. कौसल्या व सुमित्रा विलाप करतात. उर्मिळेचा अजिबात उल्लेख कोठेच नाही! कौसल्येच्या तोंडी येथे एक उल्लेख येतो ’रामा तुझे उपनयन होऊन सतरा वर्षे झालीं’ यावरून यावेळी रामाचे वय २५ वर्षे व सीतेचे २०-२१ वाटते. उर्मिळा बहुधा सीतेपेक्षा थोडी लहान असावी तरी १८-१९ वर्षांची असणार, म्हणजे अजाण नव्हे. मात्र लक्ष्मणासकट कोणीच तिला काही महत्व दिले नाही. सासवांची सेवा करण्यासाठी तिला मागेच ठेवले! भरत-शत्रुघ्नांच्या बायका यावेळी नवर्‍यांबरोबर कैकय देशालाच असणार.
सुमंत्राने कैकेयीला समजावले कीं ’भरत राजा झाला तर आम्ही सर्व रामाकडे वनात जाऊं’ कैकेयीवर परिणाम शून्य. (सुमंत्र खरेतर राजाचा व राज्याचा सेवक, त्याला नवीन राजा भरत याची सेवा करणे हेच उचित!) दशरथाने सुमंत्राला म्हटले ’रामाबरोबर मोठी सेना व धनवैभव पाठवा.’ कैकेयीने ठाम विरोध केला. सुने सुने वैभवहीन राज्य तिला भरतासाठी नको होते. तिने आग्रह धरला कीं ’पूर्वी इक्ष्वाकु घराण्यातील असमंज नावाच्या राजपुत्राला दुर्गुणी निघाल्यामुळे राज्याबाहेर घालवून दिले होते तसे रामाला घालवा.’
’ही तुझी मूळची अट नव्हती’ असे दशरथ म्हणाला पण कैकेयीने तेहि मानले नाही. तिने राम व असमंज यांना एकाच पायरीला बसवले याचा वसिष्ठासकट सर्वांनाच फार राग आला. सीतेने वल्कले नेसण्याची वेळ आली तेव्हा मात्र वसिष्ठाने व दशरथाने ठाम विरोध केला. दशरथ म्हणाला कीं ’सीता माझ्या आज्ञेमुळे नव्हे तर स्वखुषीने वनात जाते आहे. तेव्हां ती सर्व वस्त्रालंकारांसकटच वनात जाईल’. (सीतेला रामाने वल्कले नेसावयास शिकविले अशी एक थाप आपले हरदास-पुराणिक मारतात, त्यांत तथ्य नाहीं!) लक्ष्मणाने वल्कले नेसल्य़ाचा उल्लेख नाही. आपल्या आईला संभाळण्याची पित्याला विनंति करून राम वनांत जाण्यास निघाला. दशरथाने सुमंत्राला त्या तिघांना वनांत सोडून येण्यास सांगितले.
या सर्व प्रसंगांत, एकदां मंथरेचा सल्ला पटल्यावर, कैकेयीने दाखवलेला मनाचा खंबीरपणा लक्षणीय आहे.

Wednesday, April 8, 2009

अयोध्याकांड - भाग ४

कैकेयीने भरताला राज्य व रामाला वनवास मागण्याचे ठरवले. इकडे अभिषेकाची तयारी करण्यास सांगून दिवस संपल्यामुळे दशरथ नेहेमीप्रमाणे कैकेयीच्या महालीं आला. रामायण म्हणते कीं राजा म्हातारा असल्यामुळे त्याला तरुण कैकेयी फार प्रिय होती! कैकेयी बेताप्रमाने रुसून बसलेली होती. तिची समजूत काढण्यासाठी ’काय हवे ते माग’ असे दशरथ म्हणाला. पूर्वी दिलेल्या वरांची आठवण देऊन कैकेयीने भरताला राज्य व रामाला १४ वर्षे वनवास, व तोही ताबडतोब, अशा मागण्या केल्या. भरताला राज्य देण्याचे दशरथाने ताबडतोब व बेलाशक मान्य केले! कैकेयीच्या पित्याला दिलेले वचन त्याच्या स्मरणात असणारच! तेव्हां ठरवल्या बेताप्रमाणे ते डावलता येत नाही असे दिसल्यावर त्याने रामाला बाजूस सारण्याचे लगेच मान्य केले. मात्र रामाबद्दल कोणतीही तक्रार नसताना वा त्याचा काही अपराध नसताना त्याला वनवासाला पाठवणे त्याने मान्य केले नाही. त्याने अनेक युक्तिवाद केले, कैकेयीच्या विनवण्या केल्या पण कैकेयीला मंथरेने दाखवून दिलेला धोका पक्का पटला होता. ती ठाम राहिली. दशरथाचे युक्तिवाद असे –
१. रामाशिवाय भरत राज्य स्वीकारणारच नाही.
२. जमलेल्या राजे लोकांना, मंत्र्यांना, जनतेला कसे सांगूं कीं कैकेयीच्या दबावामुळे मी रामाला वनवासाला पाठवतो आहे?
३. कौसल्या, सुमित्रा, सीता सर्व दु:खित होतील. मी जिवंत राहणार नाही.
४. तुला वरताना मला कळले नाहीं कीं तूंच माझ्या मृत्यूला कारण होशील.
५. रामाने वनवासाला जाण्याची आज्ञा मानली नाही तर मला आनंदच होईल पण तसे होणार नाही.
६. रामाला राज्य देण्याची घोषणा मी भर राज्यसभेत केली आहे ती कशी मोडूं?

कैकेयीने फक्त येवढेच म्हटले कीं ’तुम्ही मोठे सत्यवादी व दृढप्रतिज्ञ म्हणवता मग मी मागत असलेले वर कां देत नाही?’ रामाला वनवासाला पाठवण्याचे कारण कैकेयीने सांगितले नाही पण दशरथानेहि विचारले नाही! त्याला ते कळलेच असणार. त्याबद्दल कैकेयीचे शंकानिरसन करण्याचा प्रयत्नहि दशरथाने केला नाही. दशरथ काकुळतीला येऊन ’मी तुझे पाय धरतों’ असेहि म्हणाला पण अखेर कैकेयीने म्हटले कीं ’सत्याचे अनुकरण करा. मी माझे मागणे त्रिवार मागत आहे आणि ते मानले नाही तर मी प्राणत्याग करीन’ बोलणेच खुंटल्यामुळे दशरथाने अखेर त्राग्याने म्हटले कीं ’विवाहाचे वेळी धरलेला तुझा हात मी सोडून देतो आहे. तूं माझी कोणी नव्हेस. तूं वा भरत मला तिलांजलिही देऊं नका!’
दशरथ येवढ्या टोकाला जाऊन कठोर बोलल्यावरही कैकेयीने आपली मागणी सोडली नाही.

Wednesday, April 1, 2009

अयोध्याकांड - भाग ३

रामाच्या अभिषेकाची बातमी मंथरेकडून कळल्यावर कैकेयीला प्रथम आनंदच वाटला. त्याअर्थी ती बहुधा भोळी-भाबडी असावी. मात्र मंथरेने तिला फटकारून समजावले कीं ’तूं राणी असून तुला राजधर्मातील उग्रता समजत कशी नाही? तुझा पति समाधानासाठी तुझ्याकडे येतो पण आता कौसल्येचे हित करतो आहे. तुला कळत कसे नाही? सवतीचा पुत्र हा शत्रू असतो. भरत व राम यांचा राज्यावर सारखाच अधिकार आहे त्यामुळे रामाला भरतापासूनच भय आहे. लक्ष्मण रामभक्त तर शत्रुघ्न शेवटचा त्यामुळे त्याचा राज्यावर मुळीच अधिकार नाही. उत्पत्तिक्रमाने रामापाठोपाठ भरताचाच राज्यावर अधिकार आहे तेव्हा रामाला त्याचेच भय वाटणार आणि त्यामुळे तो तुझ्या पुत्राला क्रूरतापूर्वक वागवील. भरताला त्याची गुलामी करावी लागेल.’
कैकेयीला हे ऐकूनहि धोका कळला नाही व ती पुन्हा भाबडेपणाने मंथरेला म्हणाली ’रामानंतर १०० वर्षांनी कां होईना, भरत राजा होईलच. तूं कशाला संतापतेस? मला भरताइतकाच रामहि प्रिय आहे. रामाला राज्य मिळणार म्हणजे भरतालाच मिळाल्यासारखे मला वाटते!’ मंथरेने तिला पुन्हा समजाविले कीं ’मूर्खे, रामानंतर त्याचा पुत्रच राजा होईल आणि भरत कायमचाच बाजूला पडेल. तुला काहीच कसे कळत नाही? रामाला राज्य मिळाले तर तो भरताला बाहेरच घालवील! भरताला तू दीर्घकाळ आजोळी राहूं दिलेस त्यामुळे त्याचे नुकसान होणार आहे. तो येथेच असता तर राजाला त्याचेहि रामासारखेच प्रेम वाटले असते व त्याला अर्धे राज्य तरी मिळाले असते. शत्रुघ्नहि येथे नाही मग भरताचे हितरक्षण तुझ्याशिवाय कोण करणार? राम लक्ष्मणावर प्रेम करतो पण भरताचा तो तिरस्कार आणि द्वेष करील. तुं भरताच्या हिताचे रक्षन केले पाहिजे. ज्या कौसल्येचा तूं अनादर करतेस ती राम राजा झाला तर तुझा सूड घेईल.’
या संवादावरून दोघीच्या स्वभावावर प्रकाश पडतो व आपल्या पूर्वग्रहांना धक्का बसल्याशिवाय राहणार नाहीं. कैकेयी भोळी दिसते तर मंथराही ’अकारण’ रामाचा द्वेष करणारी नसून कैकेयी-भरताचें हितरक्षण हे आपले कर्तव्य आहे या भावनेतून तिला जाणवणारा धोका तिने कैकेयीला स्पष्टपणे दाखवून दिला आहे. राजवाड्यातील राजकारणात तिची बाजू कोणती याबाबत तिला संदेह नाही!
आता कैकेयीचे मन पालटले. दशरथाने, पूर्वी एका युद्धप्रसंगात कैकेयीने कौशल्याने व धैर्याने त्याचे सारथ्य करून त्याचा जीव वाचवला तेव्हां तिला वर दिले होते व ते कैकेयीने लगेच न मागतां राखून ठेवले होते. त्या वरांची मंथरेनेच कैकेयीला आठवण करून दिली व ’त्या वरांचा वापर करून, भरताला राज्य व रामाला चौदा वर्षे वनवास मागून घे व भरताला निष्कंटक राज्य मिळवून दे’ असे सुचवले. ’चौदा वर्षांच्या काळात भरत जनतेचे प्रेम मिळवून स्थिर होईल व रामाचा सध्याचा प्रभाव राहणार नाही’ असा दूरदृष्टीचा व रास्त सल्ला तिला दिला. दुर्योधनाने पांडवांना वनवासाला धाडताना हाच हेतु बाळगला होता याची आठवण सहजच होते. सल्ला पटला व कैकेयीचा बेत पक्का झाला. मंथरेची तिने स्तुति केली.
पुढे एका ठिकाणी उल्लेख आहे कीं दशरथाने कैकेयीशी विवाह करताना तिच्या पित्याला वचन दिले होते कीं तिच्या पुत्राला राज्य मिळेल. तोंपर्यंत कौसल्या-सुमित्रेला पुत्र नसल्यामुळे दशरथाने तसे वचन दिले होते. (महाभारतात, सत्यवतीच्या बापाने असे वचन शंतनूपाशी मागितले पण ते शंतनु देऊ शकत नव्हता कारण पुत्र देवव्रत भीष्म वयात आला होता, त्याला कसे डावलणार?) या वचनाची मंथरा वा कैकेयी दोघींनाहि माहिती नसावी कारण याप्रसंगी तसा काही उल्लेख नाही. भरताला राज्य देण्याचे वचन खरे तर जुनेच होते आणि वरांचा वापर करण्याची गरजच नव्हती. पण दशरथानेच आपले वचन पाळले नव्हते! ( रघुकुलकी रीत, जान जाय परि वचन न जाय हे खरे ठरले नव्हते!)
यापुढील कथा पुढील भागात.

Tuesday, March 17, 2009

अयोध्याकांड - भाग २

दशरथाने भरवलेल्या सभेत आपला विचार बोलून दाखवला. ’मी उद्याच रामाला युवराजपदावर नियुक्त करूं इच्छितों’ असे म्हटले. या विचाराला संमति न देण्यासारखे काही कारणच नसल्यामुळे सर्वांनी संमति दिली. दशरथाने लगेच रामाला बोलावून घेऊन त्याला सांगितले कीं ’हा चैत्र महिना आहे, उद्याच पुष्य नक्षत्रावर युवराजपद ग्रहण कर’. तिथीचा उल्लेख त्याने केलेला नाही. कौसल्येलाही हा बेत कळवण्यात आला. दशरथाने पुन्हा रामाला बोलावून व एकांतात भेटून म्हटले कीं ’नक्षत्रे, ग्रह मला प्रतिकूल आहेत व माझ्या मृत्यूची शक्यता आहे. मला मोह होत नाही तोवरच तुला अभिषेक करून घे कारण मनुष्याची बुद्धि चंचल असते.’ पुन्हा आणखी असेहि म्हटले कीं ’जोवर भरत नगराबाहेर मामाकडे आहे तोवरच तुझा अभिषेक होणे मला उचित वाटते. भरत सत्पुरुष आहे पण माणसाचे मन नेहमीच स्थिर असत नाही.’ यावर रामानेहि दशरथाला खोडून काढून भरतावर दृढ विश्वास व्यक्त केला नाही! असा संशय येतो कीं दोघांच्याही मनात भरताबद्दल वा ठरवलेल्या बेताबद्दल काही आशंका असावी.
बेत कळल्यावर साहजिकच कौसल्या, सुमित्रा व खुद्द राम यांच्या महालात आनंदाचे वातावरण पसरले. दशरथाच्या आज्ञेवरून वसिष्ठ रामाकडे येऊन त्याने रामाला व्रतस्थ राहण्यास सांगितले. जनतेतहि बातमी पसरून शहरात आनंदोत्सव सुरू झाला. कैकेयीला याबद्दल कोणीच कळवलेले नव्हते. शहरातल्या आनंदोत्सवावरून प्रथम मंथरेला अभिषेकाचा बेत कळला व ती उद्विग्न झाली. मंथरा कोण होती? ती कैकेयीची माहेराहून आलेली, वयाने मोठी असलेली, खास दासी होती. तिने साहजिकच कित्येक वर्षे अयोध्येत काढली होतीं. कैकेयीची ती अयोध्येतील (खुद्द दशरथ सोडून) एकुलली एक हितचिंतक होती. ती कुरूप होती असे अतिशयोक्त वर्णन केलेले आहे. पण ती मूर्ख किंवा दुष्ट खासच नव्हती! बातमी कळल्यावर ती उद्विग्न व क्रुद्ध झाली. येणार्‍या संकटाची यथोचित जाणीव तिने लगेचच कैकेयीला करून दिली. कैकेयी व मंथरा यांच्या संवादावरून दोघींच्याही स्वभावावर प्रकाश पडतो व आपल्या मनातल्या ठाम समजुतींना धक्का बसतो. त्याबद्दल सविस्तर पुढील भागात.

Saturday, March 14, 2009

अयोध्याकांड - भाग १

रामायणाच्या बालकांडातील कथाभागाबद्दल अद्यापपर्यंत लिहून झाले. या लेखापासून आता अयोध्याकांडाचा परामर्ष घ्यावयाचा आहे. बालकांडाचे अखेरीस, राम, त्याचे बंधू, त्यांच्या नवीन वधू व सर्व कुटूंब अयोध्येला परत आले व लगेचच भरत व शत्रुघ्न केकय देशाला गेले असे म्हटले आहे. अयोध्याकाडाचा कथाभाग येथून पुढे सुरू होतो. मध्यंतरी किती काळ गेला याचा स्पष्ट उल्लेख रामायणात नाही. ७-८ वर्षे तरी गेलीं असावीं असा तर्क करावा लागतो. या तर्काला आधार, पुढे एका ठिकाणी कौसल्येच्या तोंडी आलेला एक उल्लेख व नंतर अरण्यकांडात सीताहरण प्रसंगी रावण व सीता यांच्यातील संवाद हे आहेत. त्याबद्दल त्या त्या प्रसंगी पुन्हा खुलासा करणार आहे. भरत-शत्रुघ्न केकय देशाहून दीर्घकाळ परत आले नाहीत. स्पष्ट उल्लेख नसला तरी केव्हातरी त्यांच्या बायकांचीहि रवानगी तिकडे झाली असावी. हे दोघे केकय देशाला एवढा दीर्घकाळ कां राहिले असावे याचे काहीहि कारण रामायणात मिळत नाही.
राज्यकारभार संभाळण्याचा कंटाळा येऊन, आपण जिवंत असतानाच राम सत्तेवर यावा असे दशरथाला वाटू लागले व त्याने मंत्र्यांबरोबर सल्लामसलत करून रामाला युवराज बनवण्याचा निश्चय केला. वेगवेगळ्या देशांतील पुरुष व राजे यांना विचारविनिमयासाठी आमंत्रित केले. मात्र, घाईमुळे राजा जनकाला व केकयराजाला बोलावले नाहीं. अशी कोणती घाई होती बरें? कैकय्रराज्य बहुधा दूर असावे पण जनक तर जवळच होता. मग दोघांना कां टाळले? हें एक शंकास्थळ आहे. योजलेल्या बेतात विघ्न येण्याची तर दशरथाला शंका नव्हती ना? कोणाकडून विघ्न येणार होते? पुढील भागांत याचा विचार करूं.

Tuesday, February 17, 2009

बालकांड - भाग ११

बालकांडाच्या अखेरच्या भागांत राम व त्याचे बंधु यांच्या विवाहाची तपशीलवार हकीगत सांगितली आहे. जनकाच्या निमंत्रणाप्रमाणे दशरथ सर्व कुटुंबियांसमवेत मिथिलेला आला. वसिष्ठ व जनकाचा पुरोहित यांनी एकमेकांच्या कुळांचा इतिहास व महिमा एकमेकांस सांगितला. जनकाने आपली दुसरी कन्या लक्ष्मणाला दिली व भावाच्या दोन कन्या भरत शत्रुघ्नांना दिल्या. राम व त्याचे बंधु यावेळी सोळा वर्षांचे होते. सीता रामाला अनुरूप वयाची असे धरले तर ती १२-१३ वर्षांची व इतर बहिणी बहुधा त्याहून लहान म्हणजे बालिकाच होत्या. सीतेच्या प्राप्तीसाठी मागणी करणार्‍या व नाकारल्यामुळे युद्धाला उभे राहिलेल्या सुधन्वा नावाच्या राजाची कथा येथे येते. त्याचा पराभव करून व त्याला मारून त्याचे राज्य जनकाने आपल्या भावाला दिले. किती वर्षांपूर्वीची ही घटना ते सांगितलेले नाही. फार पूर्वीची असणे शक्यच नाही कारण सीतेचे वय यावेळी १२-१३च होते.
चारही भावांचे विवाह पार पडले. दशरथाबरोबर कैकयराजाचा पुत्र युधाजित, भरताचा मामा, उपस्थित होता. भरताला आजोबांच्या भेटीला नेण्यासाठी तो अयोध्येला आलेला होता. तो विवाहासाठी मिथिलेला आला. कौसल्या-सुमित्रा यांच्या कुळांपैकी कोणी आल्याचा उल्लेख नाही. कौसल्या नावावरून कोसल देशाची राजकन्या असावी. तिला माहेराहून संपत्ति, गावे, मिळालेली होतीं असा पुढे उल्लेख मिळतो. सुमित्र गरीब, नगण्य घराण्यातील असावी. जनकाने हुंडा म्हणून अमाप धन, गायी, वस्त्रे, हत्ती, घोडे, रथ व सैनिकही दिले. दासदासी, रत्नेहि दिली. सीतेबरोबर १०० मैत्रिणीहि दिल्या! देवयानीबरोबर आलेली तिची मैत्रिण शर्मिष्ठा अखेर ययातीकडे पोचली, तसे रामाचे बाबतीत झाले नाही! विवाहसमारंभ आटपल्यावर विश्वामित्र आपल्या वाटेने गेले व दशरथही पुत्र, सुना, सैनिक, सेवकांसह अयोध्येला निघाले. मात्र वाटेत त्याना परशुराम आडवे आले.
त्यानी पूर्वी केलेला क्षत्रिय संहार आठवून दशरथ भयभीत झाला. परशुरामाने शिवधनुष्य तुटणे ही अद्भुत व अचिंत्य अशी घटना आहे असे म्हणून स्वत:चे धनुष्य रामासमोर धरले व म्हटले की ’हे सज्ज करून दाखव व तसे करू शकलास तर माझ्याशी द्वंद्वयुद्ध कर’. दशरथाने गयावया करून ’तुम्ही इंद्राजवळ प्रतिज्ञा करून शस्त्रांचा परित्याग केलेला आहे’ याचे स्मरण दिले. परशुरामाने त्याच्याकडे दुर्लक्ष केले! त्याने रामाला पुन्हा म्हटले की विश्व्कर्म्याने बनवलेल्या दोन खास धनुष्यांपैकी एक शिवाने त्रिपुरासुराशी युद्ध करताना वापरले व हे दुसरे विष्णूपाशी होते. पूर्वी एकेकाळी शिव व विष्णू ही धनुष्ये घेऊन युद्धाला सज्ज झाले होते. देवांनी त्यांना शांत केले. शिवावे धनुष्य शिथिल अवस्थेत जनकाच्या पूर्वजांकडे ठेव म्हणून दिले गेले व विष्णूचे हे धनुष्य भृगुवंशीय ऋचीक, नंतर माझा पिता जमदग्नि व नंतर माझ्याकडे आले. शिवधनुष्य तुटल्याचे ऐकून मी हे त्याच्या तोडीचे विष्णु धनुष्य घेऊन आलो आहे तर तू हे सज्ज करून दाखव व मग माझ्याशी द्वंद्व युद्ध कर.’ रामाने धनुष्य सज्ज केले, बाण लावला व म्हटले की ’मी हा बाण तुमच्यावर सोडत नाही पण या वैष्णव बाणाने तुमचे सर्व तपोबल किंवा तुमची द्रुतसंचारशक्ति यांतील एक काहीतरी नष्ट होईल’ परशुराम म्हणाला कीं ’मी सर्व पृथ्वी कश्यपाला दान केली व त्याने रात्री कोठेहि निवास करण्याची मला बंदी केली आहे त्यामुळे मला रात्रीपूर्वी महेंद्रपर्वतावर पोंचण्यासाठी द्रुतसंचार शक्तीची गरज आहे तेव्हां ती राहूं दे.’ रामाने त्याचे सर्व तपोबल नष्ट केले. राम हाच आपल्यानंतरचा विष्णूचा अवतार आहे हे जाणून परशुराम तपश्चर्येला निघून गेला. महेंद्रपर्वत कश्यपाला पृथ्वी दान केल्यावर परशुरामाने निर्माण केलेल्या ( वसतीखाली आणलेल्या) नवीन प्रदेशामध्ये होता काय? परशुराम यानंतर रामकथेत कोठेहि नाही, तो थेट महाभारतात पुन्हा अवतरतो. भीष्म व कर्ण हे त्याचे शिष्य त्या कथेत महत्वाचे आहेत. रामायणातील या प्रसंगामध्ये परशुरामाला एवढा कमीपणा देण्याचे काय कारण? राममाहात्म्य वाढवणे एवढेच. असे दिसते की क्षत्रियांमध्ये बलवान व्यक्ति पुन्हा जन्माला आल्या आहेत व झाला एवढा क्षत्रियसंहार पुरे हे परशुरामाला मान्य करावे लागले एवढाच मथितार्थ खरा.
विष्णुधनुष्य नंतर वरुणाला देऊन राम व दशरथ अयोध्येला गेले. लगेचच भरत व बरोबर शत्रुघ्नहि युधाजिताबरोबर कैकयदेशाला गेले. त्यांच्या पत्नी त्यांचेबरोबर गेल्याचा उल्लेख नाही. त्या अल्पवयीन असाव्या. भरत-शत्रुघ्न दीर्घकाळ कैकयदेशाला राहिले असे दिसते कारण रामाला राज्य देण्याचा बेत पुढे आला तोवरही ते परत आलेले नव्हते. मध्यंतरी किती काळ गेला? त्याचा उल्लेख रामायणात तेथे स्पष्ट नाही. त्याबद्दल पुढे विस्ताराने लिहीन. बालकांडावरचे लेखन येथे संपले.

Thursday, February 12, 2009

बालकांड - भाग १०

आता धनुर्भंगाची कथा पाहूं.
दुसर्‍या दिवशी जनकाने पुन्हा विश्वामित्र, राम व लक्ष्मण यांचे दरबारात स्वागत केले. विश्वामित्राने म्हटले कीं या दोघाना तुझे प्रख्यात धनुष्य पहावयाचे आहे. जनकाने धनुष्याचा इतिहास सांगितला कीं हें प्रत्यक्ष शिवाचे धनुष्य आहे व तें माझे पूर्वज देवरात यांना ठेव म्हणून देवांनी दिले तेव्हांपासून ते आमचेपाशी आहे. येथे फक्त एका वाक्यात, यज्ञासाठी भूमिशोधन करताना नांगराने उकरल्या जात असलेल्या जमिनीतून कन्या प्रगत झाली ती सीता, एवढाच सीतेच्या जन्माचा इतिहास जनकाने सांगितला आहे. प्रत्यक्षात, एक तर सीता ही जनकाचीच शेतकरी स्त्रीपासून झालेली कन्या असावी वा शेतांत कोणीतरी ठेवून दिलेली नवजात कन्या जनकाने स्वत:ची कन्या म्हणून वाढवली असावी यांपैकी एखादा तर्क स्वीकारावा लागतो. जनकाला त्या वेळेपर्यंत अपत्य नव्हते. जनकाला पुत्र असल्याचा कोठेच उल्लेख नाही. उर्मिळा ही पण जनकाची कन्या खरी पण ती सीतेपेक्षां लहान असली पाहिजे कारण ती लक्ष्मणाची पत्नी झाली. यामुळे जनकाने सीतेला अपत्यस्नेहापोटी स्वत:ची कन्या मानणे योग्य वाटते. रामायणाचे अनेक पाठभेद जगभर अनेक भाषांतून प्रचलित आहेत. त्यांतल्या एकांत ती रावणाची कन्या होती असाही तर्क केलेला आहे असे वाचलेले आठवते. अशा भरमसाठ तर्कापेक्षा मी वर व्यक्त केलेला तर्क कदाचित जास्त उचित म्हणतां येईल.
जनक पुढे म्हणाला कीं जो आपल्या पराक्रमाने हे शिवधनुष्य सज्ज करील त्यालाच ही माझी कन्या द्यावयाची असा माझा निश्चय आहे. पूर्वी एकदा सीतेच्या प्राप्तीसाठी सर्व राजे एकत्र जमून माझ्याकडे आले व कोणता पण लावला आहे असे त्यानी मला विचारले तेव्हा हाच पण मी त्यांना सांगितला. कोणालाही हे धनुष्य उचलता आले नाही. अपयशामुले रागावून त्या सर्वांनी माझ्याविरुद्ध युद्ध पुकारले व एक वर्षभर त्यांनी मिथिलेला वेढा घातला. शेवटीं मी देवांची प्रार्थना केली व त्यांनी प्रसन्न होहून मला चतुरंग सेना दिली व मग मी सर्व राजांना हरवून पिटाळून लावले. ( सीतेच्या प्राप्तीसाठी रावणानेही शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला होता व त्यांत तो धनुष्य उरावर घेऊन उताणा पडला अशी एक हरदासी कथा आहे मात्र तिला रामायणात कोणताही आधार नाही!) आता रामाने हे धनुष्य सज्ज केले तर मी ही माझी कन्या त्याला देईन असे जनक अखेरीस म्हणाला. ( राम यावेळी जेमतेम सोळा वर्षांचा होता. सीता फारतर १३-१४ वर्षांची असेल. तेव्हां यापूर्वीच काही काळ अनेक राजांनी तिच्या प्राप्तीसाठी शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला हे जरासे अविश्वसनीयच वाटते!)
या सर्व प्रसंगात सीता अजिबात उपस्थित नाही. तिने रामाला अद्याप पाहिलेलेहि नाही. स्वयंवर वगैरे काही समारंभ योजलेलाच नव्हता. विश्वामित्र व राम-लक्ष्मण अचानक व अनाहूतच आलेले होते. मग ’लाजली सीता स्वयंवराला पाहुनी रघुनंदन सावळा’ कोठून आले? हे गाणे लिहिणाराने सीता व द्रौपदी या दोघींच्यात मोठी गफलत केलेली दिसते!
धनुष्य राजा जनक विश्वामित्र राम व लक्ष्मण यांचेसमोर आले. संदूक उघडून रामाने ते सहजच उचलले व त्याला प्रत्यंचा लावली. त्यावर बाण न ठेवतांच त्याने ते खेचले तो तें तुटलेच.! धनुष्य कां तुटले असेल? यापूर्वी वेळोवेळी युद्धात ते त्याच्या अंतिम मर्यादेपर्यंत अनेकवार खेचले गेले असणार त्यामुळे त्याचे engineering शास्त्राप्रमाणे ’work hardening’ झाले असेल. त्यामुळे रामाने ते झटक्याने खेचले तेव्हा ते तुटले. रामाने धनुष्य सज्ज केले त्यामुळे जनकाने प्रतिज्ञेप्रमाणे सीता रामाला अर्पण केल्याचे जाहीर केले. विश्वामित्राच्या संमतीने लगेच जनकाने आपले मंत्री दशरथाकडे पाठवून, सर्व हकीगत कळवून विवाहासाठी सर्वांनी येण्याचे आमंत्रण केले. एवढेच सीता स्वयंवर! प्रत्यक्षात सीतेला कोणी कांही विचारलेच नाही! तेव्हा या प्रकाराला स्वयंवर कां म्हणावे हा प्रश्नच आहे!

Monday, February 9, 2009

बालकांड - भाग ९

या कथेमध्ये विश्वामित्राने त्रिशंकूसाठी प्रतिसृष्टि निर्माण केली असे म्हटले आहे. बर्‍याच विचारांती हे एक रूपक आहे असे माझे मत बनले आहे. त्याचा मला सुचलेला खुलासा खालीलप्रमाणे आहे. आकाशात उत्तरध्रुव व तेथून आकाशीय विषुववृत्तापर्यंतच्या आकाशाच्या भागामध्ये अनेक तारकापुंज आहेत. आकाशीय विषुववृत्ताच्या (Celestial Equator) जवळच्या लहानशा पट्ट्यातून सूर्य, चंद्र व इतर बहुतेक ग्रह फिरतात. त्यांच्या भ्रमणमार्गाच्या या पट्ट्यात जे सत्तावीस तारकापुंज येतात त्याना नक्षत्रे म्हणतात. ही सर्व भारतात आपणाला दिसतात. भारतात येण्यापूर्वी आर्यलोक आणखी उत्तरेला उत्तरध्रुवाजवळच्या भागात राहात असावेत असे लोकमान्य टिळकांचे प्रतिपादन होते. भारतात आल्यावरही विश्वामित्राच्या काळापर्यंत त्यांचे वसतिस्थान अद्याप मुख्यत्वे उत्तरभारतातच होते. हा भूभाग पृथ्वीच्या विषुववृत्ताच्या (terrestrial equator) बराच उत्तरेला २५ ते ३० अक्षांशांदरम्यान आहे. उत्तरध्रुवावरून आकाशाचा फक्त अर्धा भाग, आकाशाच्या उत्तर गोलार्धाचा, आकाशीय विषुववृत्ताच्या उत्तरेचा, दिसतो. उरलेला आकाशाचा भाग त्या भागातून आर्याना कधीच दिसत नव्हता. उत्तरभारतात आल्यावरही विश्वामित्राच्या काळापर्यंत हा दक्षिण ध्रुवापासून २५-३० अंशांपर्यंतचा आकाशाचा भाग आर्य ऋषिमुनीना दिसत नव्हता. या न दिसणार्‍या आकाशाच्या भागातहि अनेक तारकापुंज प्रत्यक्षात आहेतच. प्रत्यक्ष दक्षिण ध्रुवापाशी एखादा तारा नाही. मात्र जवळच सदर्न क्रॉस नावाचा तारा आहे. दक्षिण गोलार्धात समुद्रावर सफर करणार्‍या जहाजांना त्याचा वेध घेऊन दक्षिण दिशा ठरवतां येते. विश्वामित्राने या अद्याप सर्रास न दिसलेल्या आकाशाच्या भागामध्येहि ध्रुव, इतर तारकापुंज, कदाचित दुसरे सप्तर्षि, वा नवीन नक्षत्रे असली पाहिजेत हे तर्काने जाणले असावे वा दक्षिण दिशेला प्रवास करत असताना भारताच्या दक्षिण टोकापाशी पोचून ( हा भाग विषुववृत्तापासऊन फक्त १० अंशांवर आहे.) हे पूर्वी न दिसलेले तारकापुंज प्रत्यक्ष पाहिले असावेत व त्यांना नवीन नक्षत्रे म्हटले असावे. यालाच ’त्याने प्रतिसृष्टि निर्माण केली’ असे म्हटले गेले असावे. रामायणात, प्रतिसृष्टि निर्माण केली याचे वर्णन ’दक्षिणमार्गासाठी नवीन सप्तर्षींची सृष्टि केली व नवीन नक्षत्रेहि निर्माण केली’ असेच केले आहे. रामायणात, सर्ग ६०-श्लोक २४ ते ३२ मध्ये ऋशिमुनींनी व देवांनी विश्वामित्राने निर्माण केलेली प्रतिसृष्टि मान्य केली व ’तुम्ही निर्माण केलेली सर्व नक्षत्रे वैश्वानरपथातून बाहेर प्रकाशित होतील व त्यांत त्रिशंकूहि प्रकाशमान होईल’ असा त्यांना वर दिला असे म्हटले आहे. याचा अर्थ विश्वामित्राचे संशोधन व/वा तर्क ऋषिमुनीनी मान्य केला असा केला पाहिजे. मूळची सत्तावीस नक्षत्रे सूर्याच्या भ्रमणमार्गावर म्हणजे वैश्वानरपथावर आहेत व नवीन नक्षत्रे त्याचे बाहेर, आणखी दक्षिणेला, आहेत हे बरोबर जुळते. रामायणातच असलेल्या या सर्व वर्णनावरून प्रतिसृष्टि निर्माण केली म्हणजे काय याबद्दलचा हा खुलासा मला सुचला आहे. आकाशाच्या या दक्षिणध्रुवाजवळपासच्या भागात एखाद्या तारकापुंजात ’खालीं डोके-वर पाय’ अशा अवस्थेत लोंबकाळणार्‍या माणसासारखा दिसणारा एखादा तारकासमूह आहे काय? असल्यास तोच त्रिशकु! हा तर्क तपासून पाहणे मात्र माझ्या कुवतीबाहेरचे आहे. जो तर्क वा खुलासा वाचलेल्या मजकुरांतून सुचला तो आपणापुढे ठेवला आहे!

Wednesday, February 4, 2009

बालकांड - भाग ८

यानंतर धनुर्भंग, राम-सीता विवाह व परशुरामाशी विवाद हा बालकांडाचा अखेरचा भाग पाहण्यापूर्वी विश्वामित्रकथा पाहूं. अहल्येच्या भेटीनंतर राम-लक्ष्मण व विश्वामित्र जनकराजाच्या मिथिलानगरीचे बाहेर उतरले होते. जनकाचा एक यज्ञ चालू होता व त्यानिमित्त ब्राह्मण, ऋषि व शिष्य यांची गर्दी उसळली होती. राजा जनक व पुरोहित शतानंद यांनी विश्वामित्राची भेट घेतली व आदरसत्कार केला. यज्ञाचे उरलेले बारा दिवस येथेच रहा असा आग्रह केला. मग राम-लक्ष्मणांची चौकशी केली. विश्वामित्राने त्यांची माहिती व महती सांगून त्यांना तुझे महान धनुष्य पहावयाचे आहे असे म्हटले. शतानंदाने मातापित्यांची चौकशी केली व मग रामलक्ष्मणांना विश्वामित्रांची सर्व कथा सांगितली. महाभारतांतहि विशामित्राची कथा आहेच. मात्र दोन्ही कथांत थोडाफार फरक आहे.
विश्वामित्राने वसिष्ठांच्या कामधेनूची मागणी केल्यामुळे त्या दोघांचा संघर्ष झाला. विश्वामित्राने कामधेनूचे जबरदस्तीने हरण करण्याचा प्रयत्न केला तेव्हां वसिष्ठांच्या सांगण्यावरून तिने स्वत:च सैन्य निर्माण करून स्वत:चे संरक्षण केले. विश्वामित्राच्या सर्व सैन्याचा संहार झाला. त्याचे शंभर पुत्र वसिष्ठाच्या क्रोधाला बळी पडले. उरलेल्या एका पुत्राला राज्य देऊन (विश्वामित्र मूळचा क्षत्रिय राजा) विश्वामित्र तपश्चर्येला गेला. अस्त्रे मिळवून त्याने पुन्हा वसिष्ठावर चाल केली. पण एका ब्रह्मदंडाच्या बळावर वसिष्ठाने त्याचा पुन्हा पराभव केला. तेव्हां ब्राह्मबळापुढे क्षात्रबळाचा निभाव लागत नाही म्हणून क्षत्रियबळाचा धि:क्कार करून विश्वामित्र ब्रह्मर्षिपद मिळवण्याच्या प्रयत्नाला लागला. त्याच्या तप:चर्येला पहिला अडथळा आला तो त्रिशंकूने सदेह स्वर्गाला जाण्यासाठी त्यांची मदत मागितली याचा. वसिष्ठपुत्रांनी त्रिशंकूला मदत नाकारल्यामुळे ईर्षेला बळी पडून विश्वामित्राने आपले तपोबल त्रिशंकूसाठी पणाला लावले. इंद्राने त्रिशंकूला सदेह स्वर्गात प्रवेश नाकारला व स्वर्गातून ढकलून दिल्यामुळे खाली डोके-वर पाय अशा अवस्थेत तो पृथ्वीवर पडू लागला. त्याला आकाशातच लटकत ठेवून त्याच्यासाठी विश्वामित्राने प्रतिसृष्टि निर्माण केली. (प्रतिसृष्टि हे काय प्रकरण आहे याबद्दल पुढील भागात विस्ताराने लिहिणार आहे.) या सर्व खटाटोपात पुण्यक्षय झाल्यामुळे विश्वामित्र पुष्करतीर्थामध्ये पुन्हा तपश्चर्येला बसले. त्या काळी मेनका ही अप्सरा पुष्करतीर्थात स्नानाला आली. ती स्वत:हूनच आली होती. तिला इंद्राने विश्वामित्राचा तपोभंग करण्यासाठी पाठवले होते असे रामायण म्हणत नाही! मात्र तिच्या मोहात विश्वामित्र पडला हे खरे. एकूण दहा वर्षांचा काळ त्यांनी एकत्र घालवला. हा क्षणिक मोह नक्कीच नव्हता!. रामायणात येथे शकुंतलेचा मात्र अजिबात उल्लेख नाही! दहा वर्षांनी विश्वामित्र भानावर आले. त्यांनी मेनकेला मधुर शब्दात निरोप दिला व पुन्हा तपाला आरंभ केला. यावेळी प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने येऊन कौतुक केले पण ब्रह्मर्षिपद मान्य केले नाही. कारण विश्वामित्र अजूनहि जितेंद्रिय झालेले नव्हते. पुन्हा घोर तपश्चर्या चालू राहिली. यावेळी तपोभंगासाठी इंद्राने रंभेला पाठवले. तिच्या दर्शनाने काम व क्रोध दोन्हीहि जागृत झाल्यामुळे निराश होऊन विश्वामित्राने तिला शाप दिला व पुन्हा खडतर तप चालू केले. यावेळी मात्र त्यांनी सर्व विकारांवर विजय मिळवला व आपले ब्रह्मर्षिपद खुद्द वसिष्ठांकडूनच मान्य करवून घेतले. त्यांचे वैर संपून मैत्री झाली. खडतर प्रयत्नानी स्वत:च्या मनोवृत्तींवर विजय मिळवतां येतो हे त्यानी दाखवून दिले. रामायणातील विश्वामित्रकथा ही अशी आहे. महाभारतापेक्षां ही जास्त विस्तृत आहे व रंजकही आहे.

Sunday, February 1, 2009

बालकांड - भाग ७

यानंतर गौतम-अहल्येची प्रसिध्द कथा पाहूं. जनकाच्या मिथिला नगरीत प्रवेश करण्यापूर्वी उपवनात एक उजाड आश्रम दिसला तेव्हां हा कोणाचा असे रामाने विचारले. त्यावर विश्वामित्राने हा आश्रम गौतमाचा असे म्हणून गौतम अहल्येची कथा रामाला सांगितली. ती आपल्या समजुतीपेक्षां बरीच वेगळी आहे. गौतम बाहेर गेलेले असताना, अहल्येची अभिलाषा धरून इंद्र गौतमवेषाने अहल्येकडे आला. हा गौतम नव्हे, इंद्र आहे हें अहल्येला कळले होते. मात्र तरीहि खुद्द देवराज इंद्र आपली अभिलाषा बाळगतो याचा आनंद व अभिमान वाटून अहल्या इंद्राला वश झाली. हेतु साध्य झाल्यावर मात्र गौतमाच्या भयाने इंद्र पळून जात असतानाच गौतम परत आले. झालेला प्रकार ओळखून त्यांनी इंद्राला रागाने घोर शाप दिला, ज्यायोगे त्याचे वृषण गळून पडले. अहल्येची त्यांनी निर्भर्त्सना केली पण शाप दिला नाही! ती शिळा होऊन पडली नाही. ’आपला संसार संपला, मी निघून जातो आहे. झाल्या गोष्टीचा पश्चात्ताप करीत दीर्घ काळपर्यंत तूं येथेच रहा. कालांतराने तुझ्या दुराचरणाचा दोष तुझ्याच तपाचरणाने पुसून जाईल. पुढे राम येथे येईल ती त्याची कालमर्यादा राहील. त्यांनंतर मी पुन्हा तुझा स्वीकार करीन’ असे म्हणून गौतम निघून गेले. गौतमाचे सांगणे मानून अहल्या तेथेच तपाचरण करीत राहिली. ही सर्व कथा सांगून विश्वामित्राने रामाला म्हटले कीं ’अहल्या येथेच आहे तेव्हां तिची भेट घे’. तिचा उद्धार कर वगैरे काही मुळीच सांगितले नाही!
राम लक्ष्मण व विश्वामित्र आश्रमात जाऊन अहल्येला भेटले. रामाने अहल्येला पाहिलें तेव्हां ती दीर्घ तपाचरणामुळे दैदीप्यमान अशी रामाला दिसली. तिने राम-लक्ष्मण व विश्वामित्र यांचा आदर सत्कार केला. राम-लक्ष्मणांनी तिच्या चरणांना स्पर्श करून वंदन केले. तेवढ्यांत गौतमहि येऊन त्यानीहि विश्वामित्राला वंदन केले व अहल्येचा स्वीकार केला. पुढे जनकाच्या नगरीत जनकाचा पुरोहित असलेला गौतम-अहल्यापुत्र शतानंद याने रामाकडून हीसर्व हकीगत समजावून घेऊन मातापित्यांचा समेट झाल्याचे ऐकून समाधान व आनंद व्यक्त केला.
ही कथा जशी रामायणात आहे तशीच, नैसर्गिक, उज्ज्वल व रोचक वाटते. तिचें, अहल्या शापामुळे दीर्घकाळ शिळा होऊन पडणे, रामाच्या पायधुळीमुळे ती पुन्हा मानवरूपात येणे, असे खुळचट स्वरूप कां व केव्हां बनले असावे? रामाला ईश्वरावतार मानले जाऊ लागल्यावर निव्वळ रामाला मोठेपणा देण्यासाठी झाला असावा. इंद्र भेटीपूर्वीचा शतानंदाचा जन्म, इंद्रभेटीपूर्वीच तो आश्रम सोडून गेलेला होता म्हणजे तेव्हां तो १५-२० वर्षांचा असावा. तो रामाला भेटला तेव्हा त्याचे वर्णन अतिवृद्ध असे केलेले नाही. त्या अर्थी फारतर २०-२५ वर्षे अहल्येने तपाचरणात व्यक्त केली. युगानुयुगे शिळा होऊन पडून राहून रामाची वाट पाहत नव्हे हे निश्चित! ’पाउलातली धूळ होउनी’ वगैरे सर्व खोटे! अहल्येची खरी कथा खुद्द वाल्मिकिरामायणात स्पष्ट लिहिलेली असूनहि आपण तिचे भ्रष्ट स्वरूप बिनदिक्कत स्वीकारतो याचे नवल वाटते.

Friday, January 30, 2009

रामायण बालकांड - भाग ६

चौघा राजपुत्रांचे बालपण संपण्याच्या सुमारासच विश्वामित्र ऋषि दशरथाकडे आले व यज्ञाला उपद्रव देणार्‍या मारीच सुबाहु वगैरे राक्षसांचा प्रतिकार करण्यासाठी त्यांनी रामाची मागणी केली. दशरथ स्वत: एक अक्षौहिणी सैन्य घेऊन मदतीस जाण्यास तयार होता पण विश्वामित्राला रामच हवा होता. वसिष्ठांनी विश्वामित्रांचा सर्व महिमा सांगून त्यांचा हवाला दशरथाला दिला व मग राम-लक्ष्मण विश्वामित्राबरोबर गेले. यावेळी भरत कोठे होता? रामाबरोबर जाण्यासाठी त्याचे नाव पुढे आले नाही. तो कदाचित आजोळी असावा. राम-लक्ष्मण यावेळी १५-१६ वर्षांचे होते. राम अजून १६ वर्षांचाहि झालेला नाही असे दशरथच विश्वामित्राला म्हणाला होता.
यज्ञाला त्रास देणारा मारीच हा सुंद व ताटकेचा पुत्र. सुबाहु हा उपसुंदाचा पुत्र पण ताटकेचा पुत्र असा स्पष्ट उल्लेख नाही. सुंद-उपसुंद हे मोहिनीच्या मोहात पडले व आपसात लढून मेले पण त्याना त्यापूर्वी ताटकेपासून पुत्र झाले होते असे दिसते. ताटका स्वत: सुकेतु यक्षाची कन्या. मग या सर्वांची गणना राक्षसांत कां होते? यज्ञसंस्कृति न मानणारे ते राक्षस असे म्हणावे तर राक्षसराज रावण हा स्वत: यज्ञ करीत असे! अगस्तीच्या शापाने मारीच-सुबाहु राक्षस झाले असे म्हटले आहे. त्यांच्या वर्तणुकीमुळे त्यांची राक्षसांत गणना होत असावी. रामायणातील राक्षस व वानर कोण हे एक न उलगडणारे कोडे आहे. वानर इतरत्र कोठेहि नाहीत. राक्षस मात्र सर्वत्र असतात पण त्यांचे जन्म क्षत्रिय वा ब्राह्मण कुळांत असतात. त्यांच्या मनोवृत्ति वा वर्तणुकीमुळे त्यांची गणना राक्षसांत होत असावी. उदा. रावण, जरासंध वा कंस.
यानंतर येणारी ताटकावधाची, सगर/भगीरथांची व समुद्रमंथनाची कथा मी बाजूस ठेवणार आहे. भगीरथाने गंगा भूमीवर आणणे हे एक रूपक आहे व गंगेचे खोरे शेतीखाली आणण्याशी त्याचा संबंध असावा असा माझा तर्क आहे. समुद्रमंथन कथेमध्ये एक गमतीचा उल्लेख मिळाला. समुद्रमंथनातून बाहेर आलेली सुरा, म्हणजे दारू, ही देवांनी पळवली, राक्षसांनी नव्हे! सुरा पिणारे ते सुर व न पिणारे ते असुर असे चक्क म्हटले आहे! तेव्हा आपणाला असुर म्हणवून घ्यावयाचे नसेल तर सुरा प्यावी लागेल! पहा बुवा!
यापुढील प्रसंग पुढील भागात.

Tuesday, January 27, 2009

रामायण बालकांड - भाग ५

यापुढच्या सर्ग १७ मध्ये अनेक देवांनी याचवेळी अनेक वानरवीरांना जन्म दिला असा खुलासेवार उल्लेख केला आहे. त्यांत सर्व प्रमुख वानरवीरांचा उल्लेख आहे. यातील अद्भुतरस मी सोडून देतो. वाली हा इंद्रपुत्र व सुग्रीव हा सूर्यपुत्र असे म्हटले आहे. त्यावरून ते जुळे भाऊ नव्हते हें उघड आहे. मात्र ते दिसावयास अतिशय सारखे असल्यामुळे पुढे द्वंद्वयुद्ध करणार्‍या दोघांपैकी वाली कोण व सुग्रीव कोण हे रामाला ओळखू येईना व पहिल्या प्रयत्नाचे वेळी वालीला मारता आले नाही असे वर्णन केले आहे. पुन्हा द्वंद्व करताना सुग्रीवाने गळ्यात पुष्पमाला घातली व मग रामाला वालीवर बाण सोडतां आला. या प्रसंगामुळे ते जुळे भाऊ असावेत असा समज होतो तो खरा नाही. पुढे महाभारतात अर्जुन हा इंद्रपुत्र व कर्ण हा सूर्यपुत्र असे वर्णन आहे मात्र त्यांना कोणी वाली-सुग्रीवांचे अवतार मानत नाही! कारण ते पडले वानर! दोन्ही ठिकाणी इंद्रपुत्र जास्त प्रबळ वर्णिला आहे.
यज्ञाच्या प्रभावाने म्हणा कीं यदृच्छेने म्हणा पण दशरथाला राम, भरत, लक्ष्मण व शत्रुघ्न असे चार पुत्र पाठोपाठ झाले. त्यांच्या वयामध्ये किती फरक होता याचा स्पष्ट उल्लेख कोठेच केलेला नाही. सुमित्रेने लक्ष्मण व शत्रुघ्न यांना जन्म दिला असे म्हटले आहे पण ते जुळे होते असे स्पष्ट म्हटलेले नाही. पण पाठोपाठ जन्म झालेले असल्यामुळे ते जुळे असलेच पाहिजेत. यज्ञानंतर एक वर्षाने रामाचा जन्म झाला व चौघांचाहि नामकरण विधि एकदमच झाला असे म्हटले आहे. लक्ष्मण व शत्रुघ्न यांचा जन्म आश्लेषा नक्षत्रावर व कर्कलग्नी झाला या वर्णनावरूनहि ते जुळे असले पाहिजेत याला दुजोरा मिळतो. तसें नसतें तर एकाच नक्षत्रावर जन्म घेण्यासाठी त्यांच्या वयात एखाद्या वर्षाचा फरक पडला असता. राम व भरत या दोघांच्याहि जन्मराशि व जन्मनक्षत्रे दिलीं आहेत. राम पुनर्वसु नक्षत्रावर व कर्कलग्नीं तर भरत पुष्य नक्षत्रावर व मीनलग्नीं जन्मला. रामाचा जन्म माध्यान्हीला झाला हे सर्वमान्य आहे. भरताची जन्मवेळ दिलेली नाही. एवढ्या माहितीवरून त्यांच्या जन्मवेळेत किती फरक होता हे ठरवतां येते काय हे मला निष्चित माहीत नसल्यामुळे थोडेफार ज्योतिष जाणणार्‍या एका व्यक्तीशी चर्चा केली त्यावरून असे दिसून आले कीं भरत हा रामजन्माच्या दुसर्‍या दिवशी सकाळच्या सुमारास म्हणजे रामानंतर १७-१८ तासांनी जन्मला. लक्ष्मण-शत्रुघ्नांच्या जन्मनक्षत्र-राशीवरून असेच गणित करून ते रामजन्मानंतर दोन दिवसांनी दोन-प्रहरी जन्मले. म्हणजे ते रामाहून दोन दिवसांनी लहान होते. ज्योतिषाची आवड व अभ्यास असणारांनी यावर अधिक प्रकाश टाकावयास हरकत नाही. रामायण काळी आपल्याकडे राशी होत्या काय याबद्दल शंका आहे. त्या बर्‍याच पुढे, वराहमिहिराच्या काळी आल्या (ग्रीकांकडून?) राशिनामे आपलीं व ग्रीकांची एकच आहेत. कोणी कोणाकडून घेतली? मात्र, रामायणानंतर दीर्घकाळाने झालेल्या महाभारतकाळीहि अधिक मासांचे गणित- आजच्याप्रमाणे-राशिसंक्रमणाशी जुळवलेले नव्हते. ५८ चांद्रमासांनंतर दोन अधिक चांद्रमास एकदम घेतले जात. यावरून, महाभारतकाळीहि राशिकल्पना व राशि-संक्रमण-दिन निश्चिति माहीत नव्हती म्हणावे लागते. सूक्ष्म वेध घेण्याच्या पद्धति आटोक्यात येईपर्यंत ते शक्यहि नव्हते. रामायणात हे जन्मराशींचे उल्लेख मागाहून घातले गेले काय? हा प्रष्न मी वाचकांवरच सोडतो!

Monday, January 19, 2009

रामायण बालकांड - भाग ४

दशरथाच्या यज्ञाला राजा जनक ’जुना संबंधी’ या नात्याने आला होता. म्हणजे दोन्ही कुळांचा राम-सीता विवाहापूर्वींहि संबंध होता असे दिसते. कैकय राजा, कैकेयीचा पिता, हाहि उपस्थित होता. कौसल्या वा सुमित्रा यांच्या माहेरच्या कुळांचा उलेख नाही. कौसल्या, तिच्या नावावरून कोसल देशाची राजकन्या असावी असे म्हणता येईल. सुमित्रा कोठली याचा मात्र खुलासा कोठेच नाही. दशरथाने तिच्याशी विवाह सौंदर्यामुळे वा पुत्रप्राप्तीसाठी केला असावा.
यज्ञीय अश्व एक वर्षानंतर परत आला. अश्वाबरोबर दशरथ स्वत: ससैन्य गेलेला नव्हता. मुलगे नव्हतेच तेव्हा प्रश्नच नव्हता. मात्र कोणाबरोबरहि युद्धप्रसंग उद्भवला नाही. दशरथाबद्दल इतर राजाना आदर असावा. यानंतर यज्ञाचे खुलासेवार वर्णन आहे. अनेक पशूंचे बळी दिले गेले. अश्व्मेधातील एक विचित्र प्रथा म्हणजे यज्ञाचे शेवटी अश्वाशेजारी राणीने एक रात्र शयन करणे! या प्रथेचा उल्लेख महाभारतातहि द्रुपदाच्या यज्ञाच्या संदर्भात आहे. यामागे काय तत्व असावे हे कळत नाहीं. यानंतर त्याच अश्वाचा यज्ञात बळी देऊन यज्ञ समाप्त झाला. ऋष्यशृंगाने राजाला ’तुला चार पुत्र होतील’ असा आशीर्वाद दिला. दशरथाला एकहि पुरला असता! एकच मिळाला असता तर राम वनात गेलाच नसता व रामायणच झाले नसते! येथे दशरथाच्या वैश्य व शूद्र स्त्रियांचा उल्लेख आहे. त्यानंतर पुत्रेष्टि हा स्वतंत्र यज्ञ अथर्ववेदाच्या मंत्रांनी केला गेला. पुत्रप्राप्तीसाठी करावयाचा हा यज्ञ बहुधा गौण मानला जात असावा म्हणून वसिष्ठांनी स्वत: न करता ऋश्यशृंगाला बोलावले. अश्वमेधाचे निमित्तने दशरथाने त्याला अपार धन दिले व मग त्याने पुत्रेष्टि यज्ञ करून दिला असा प्रकार दिसतो!
यज्ञात प्रजापतिलोकांतील पुरुष प्रगट झाला व त्याने क्षीरपात्र दशरथाला देऊन ’ही खीर तुझ्या योग्य त्या पत्नीला दे’ असें म्हटले. खिरीची वांटणी करताना, दशरथाने अर्धी कौसल्येला, पाव सुमित्रेला व अष्टमांश कैकेयीला दिली व उरलेली अष्टमांश, काही विचार करून पुन्हा सुमित्रेलाच दिली. असा कोणता विचार त्याने केला असेल बरे?
खिरीची वांटणी करताना दशरथाने राण्यांच्या सीनियॉरिटीला प्राधान्य दिलेले दिसते. यज्ञाला कैकय राजा उपस्थित होता. खिरीच्या वांटणीत आपल्या मुलीला फक्त अष्ट्मांश वाटा मिळाला याबद्दल त्याने राग वा तक्रार केलेली नाही! खुद्द कैकेयीनेहि तक्रार केली नाही. यामुळे ती दुष्ट वा मत्सरी होती या समजुतीला आधार दिसत नाही. मला तर ती भोळी-भाबडी वाटते!

Tuesday, January 13, 2009

रामायण बालकांड - भाग ३

दशरथाने पुत्रप्राप्तीसाठी पुत्रकामेष्टि यज्ञ केला अशी आपली समजूत असते. प्रत्यक्षात त्याने अश्वमेध केला. यावेळी दशरथाचे वय काय असावे? पुढे विश्वामित्राच्या आगमनाचे वेळी ’आपण साठ वर्षांचे आहोत व राम जेमेतेम सोळा वर्षांचा आहे’ असे तो म्हणाला. यावरून यज्ञाचे वेळी तो साधारण ४२-४३ वर्षांचा होता. म्हणजे अपत्ये होण्याचें त्याचें वय गेलेलें नव्हतें. मात्र तीन विवाह करूनहि पुत्रप्राप्ति झाली नव्हती. पुढे उल्लेख अहे कीं तीन राण्यांशिवाय त्याचा इतरहि बराच राणीवसा होताच! थोर असे वसिष्ट ऋषि राजाचे दरबारात असूनहि अश्वमेधाची जबाबदारी त्यानी स्वीकारली नाही! त्यासाठी ऋष्यशृंग ऋषीना बोलावून घ्यावे असा त्यानी दशरथाला सल्ला दिला. त्यानी असे कां केले असावे? दशरथाचा यज्ञ नेहमींचा अश्वमेध नव्हता. पुत्रप्राप्ति हा हेतु होता. पुत्रप्राप्तीच्या हेतूने करावयाच्या यज्ञामध्ये काही गौणत्व मानले जात होते काय? महाभारतातहि, द्रुपदाचा यज्ञ करण्यास कोणी ब्राह्मण / ऋषि तयार नव्हता असे म्हटले आहे. कदाचित या गौणत्वामुळेच वसिष्ठाने स्वत: यज्ञ चालवला नसावा.
या ऋश्यशृंगाची कथा मजेदार आहे. जन्मापासून तो वनात पिता व इतर ऋषिमुनि यांच्याच सहवासात वाढला होता. त्यामुळे त्याला स्त्रीरूप माहीतच नव्हते! रोमपाद नावाच्या राजाच्या राज्यात दीर्घकाळ दुष्काळ पडला होता व ’ऋष्यशृंग तुझ्या राज्यात रहावयास आला तर त्याच्या पुण्याईने पाऊस पडेल’ असे त्याला सांगण्यात आले. त्याला मोहात पाडून घेऊन येण्याची कामगिरी वेश्यांकडे सोपवली गेली. त्यांना पाहून, या स्त्रिया हे न कळल्यामुळे हे कोणी वेगळ्याच प्रकारचे मुनि आहेत असे त्याला वाटले! मात्र रोमपादाच्या इच्छेप्रमाणे ऋष्यशृंग त्याच्या राज्यात आला व मग त्याच्या पुण्याईने रोमपादाचे पाप नष्ट होऊन पाऊस पडला! रोमपादाने आपली कन्या शांता त्याला दिली व ऋश्यशृंग त्याचेपाशी राहिला. दशरथाने आमंत्रण दिले त्याचा मान ठेवून रोमपादाने ऋश्यशृंगाला त्याचेकडे पाठवले. पूर्ण एक वर्षभर तयारी चालून मग दशरथाचा अश्वमेध झाला. त्याची कथा पुढील भागात पाहूं.

Friday, January 9, 2009

रामायण बालकांड - भाग २

सुरवातीच्या सर्ग १ मध्ये नारदाने वाल्मिकीला रामकथा सांगितली आहे. वाल्मिकीने नारदाला विचारले कीं सांप्रत सर्वगुणानी संपन्न असा कोण पुरुष आहे? त्यावर नारदाने राम असे म्हणून त्याचे वर्णन केले व संक्षिप्त रामकथा सांगून ’सद्ध्या राम व सीता अयोध्येत राज्य करीत आहेत’ असे म्हटले. वर्तमानकाळाचा वापर दर्शवितो कीं रामाने सीतेचा त्याग करण्याअगोदरची ही घटना आहे. राम दीर्घकाळ राज्य करील असे नारदाने म्हटले. या अतिसंक्षिप्त रामकथेत व पुढील विस्तृत रामायणामध्ये साहजिकच काही फरक दिसून येतात. राम वनात गेला तेव्हा दशरथ त्याला पोचवण्यासाठी दूरवर बरोबर गेला असे येथे म्हटले आहे! रामाने विश्वामित्राबरोबर जाणे, ताटकावध, धनुर्भंग वगैरे येथे काही नाही! वालीसुग्रीवाची राजधानी किष्किंधा हिचे वर्णन ’गुहा’ असे केले आहे.
दुसर्‍या सर्गामध्ये प्रख्यात असा क्रौंचवधप्रसंग व वाल्मिकिची पहिल्या ’मा निषाद प्रतिष्ठां त्वम …’ या श्लोकाची रचना वर्णिली आहे. आपण काहीतरी नवीनच केले असे वाल्मिकीला वाटले तेव्हाच खुद्द ब्रह्मदेवाने प्रगट होऊन श्लोकरचनेबद्दल वाल्मिकीचे अभिनंदन केले व तसे करण्याची मीच तुला प्रेरणा दिली, आता संपूर्ण रामकथा तूं श्लोकबद्ध कर अशी त्याला आज्ञा केली. रामायण रचनेमागची ही पार्श्वभूमि या दोन सर्गांत वर्णिली आहे.
सर्ग तीन मध्ये रामायणाची सर्व कथा पुन्हा एकदा संक्षिप्त स्वरूपांत वाल्मिकीने स्वत:च्या शब्दांत सांगितली आहे. येथे मात्र कथेचा शेवट प्रजेच्या समाधानासाठी रामाने सीतेचा त्याग करण्यापर्यंत नेला आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे. रामाने त्यागिल्यानंतर सीता दीर्घकाळपर्यंत वाल्मिकीच्याच आश्रमात राहिली व लवकुशांचा जन्म व सर्व संगोपन तेथेच झाले त्यामुळे राम-सीता यांनी दीर्घकाळपर्यंत राज्य केले हा नारदाने सांगितलेला रामकथेचा शेवट खरा नाही हे वाल्मिकीला ठाऊकच होते. पहिला सर्ग व तिसरा सर्ग यांमध्ये १३-१४ वर्षांचा काळ लोटला असे दिसते. कदाचित नारदाने रामकथा सांगितली तेव्हा राम-सीता आता दीर्घकाळ राज्य करतील अशी नारदाची अपेक्षा असावी !
उत्तर-रामचरित्र हा रामायणाचा भाग मानावयाचा कीं नाही हा एक विद्वानांचा वादविषय आहे अशी माझी कल्पना आहे. रामायण वाल्मिकीने प्रथम रचले व लवकुशांना शिकविले तेव्हा सीतेच्या त्यागाचा सुरवातीचा कथाभाग त्यांत कदाचित समाविष्ट असावा. लवकुशांनी अयोध्येत जाऊन ते लोकांना व नंतर खुद्द रामाला ऐकविले. त्यानंतर राम स्वत: वाल्मिकीच्या आश्रमांत आला, सीतेची भेट झाली व वाल्मिकीने सीतेबद्दल सर्वतोपरी आश्वासन दिले तरीहि रामाने सीतेचा स्वीकार केला नाहीच व संशयही पूर्णपणे सोडला नाही. तेव्हां निराशेने सीता भूमिगत झाली व शोकाकुल राम लवकुशांना घेऊन अयोध्येला परत गेला हा अखेरचा कथाभाग तर मूळ रामायण रचनेच्या वेळी घडलेलाच नव्हता त्यामुळे तो मूळच्या रामायणांत समाविष्ट असण्याचा संभवच नाही. मात्र त्यानंतर केव्हातरी वाल्मिकीने स्वत:च वा इतर कोणाकडून तरी हा कथाभागहि रामायणात समाविष्ट केला असावा. अर्थात तो रामकथेचा अनिवार्य भागच आहे. रामाने सीतेचा केलेला कायमचा त्याग हा योग्य कीं अयोग्य, न्याय्य कीं अन्याय्य हा एक कूट्प्रष्न आहे व रामावर अतीव श्रद्धा बाळगणारांनाहि तो अवघडच आहे.
वाल्मिकीने श्लोक व अनुश्टुभ छंद पहिल्याने रचला कीं इतर पूर्वींची कांही रचना त्या छंदांत आहे हे मला माहीत नाही. मात्र वेद, उपनिषदे रामायणाच्या खूप पूर्वींचीं व त्यांत काव्यमय व गेयहि रचना – सूक्तें- आहेत अशी माझी समजूत आहे. तसे असेल तर मग रामायणाला आदिकाव्य कां म्हणतात असा मला प्रश्न आहे.
सर्ग ४ मध्ये वाल्मिकीने सर्व रामकथा सात सर्गांत रचली असे म्हटले आहे व त्यांत उत्तरकांडाचाही समावेश आहे. नंतर तें लवकुशांना शिकवले गेले व त्यांचेकडून त्याचे गायन फार परिणामकारक होते असे सर्व मुनिगणांचे मत होऊन सर्वांनी त्याना कौतुकाने त्यांना काही भेतवस्तू दिल्या. त्यांत छाटी, लंगोटी, रुद्राक्षांची माळ अशा नामी वस्तूंचा समावेश होता! लवकुश अयोध्येच्या रस्त्यांतून रामायण गात फिरत असतांना खुद्द रामानेच त्यांना दरबारांत नेऊन त्यांचे कौतुक व सन्मान केला व सर्व रामायण गाण्याची त्यांना आज्ञा केली. त्यावेळी त्यांनी गाइलेली रामकथा म्हणजे पुढील सर्व सर्गांत व उत्तरकांड सोडून इतर कांडांत आलेले रामायण होय. इथून पुढे, लवकुशांचा वा दरबाराचा उल्लेख न करतां सर्व रामकथा क्रमवार सांगितली आहे. सर्वसाधारणपणे सर्व रामकथा आपल्या सर्वांच्या भरपूर परिचयाची असल्यामुळे ती सर्व क्रमाने सांगण्याचा माझा विचार नाही. रामायण वाचताना कित्येक ठिकाणी आपल्याला आश्चर्याचे धक्के बसतात व आपले दीर्घकाळचे काही समज चुकीचे असल्याचे दिसून येते. बालकांडांतील व पुढे इतर कांडांतीलहि अशा प्रसंगांवर लिहिणार आहे.

Tuesday, January 6, 2009

रामायण - बालकांड - भाग १

महाभारताप्रमाणेच रामायणाचेहि माझे वाचन मर्यादितच आहे. विदर्भ-मराठवाडा कंपनीने प्रकाशित केलेले रामायणाचे भ्हाषांतराचे पांच खंड मला वाचावयास मिळाले. त्यांत वाल्मिकि-रामायणाची मूळ कथा विद्वान संपादकांनी अभ्यासपूर्वक भाषांतर करून छापलेली आहे. त्यांचे भाषांतर अचूक आहे व उत्तम आहे असे मी गृहीत धरलेले आहे. माझा संस्कृतचा अभ्यास नसल्यामुळे तसे करण्यावाचून पर्याय नाही! रामायणाची इतर अनेक भाषांतरे व आवृत्त्या जगभर प्रसिद्ध झाल्या आहेत. रामकथेचे स्वरूप या ग्रंथांतून देशोदेशीं भाषा, काळ, लेखक, संस्कृति यानुरूप बदलत आले आहे. यांचा तौलनिक अभ्यास हे महा-विद्वानांचे काम आहे, माझे नव्हे, तेव्हां त्या भानगडीत न पडतां, मूळ वाल्मिकि रामायणाचे समोर असलेले भाषांतर आपल्याला पुरेसे आहे असे मी ठरवले.
प्रत्यक्ष रामकथा आपल्याला सर्वसाधारणपणे परिचित असते. अनेक महाकाव्यें, नाटकें, कादंबर्‍यांना तिने जन्म दिला आहे. साधारण्पणे श्रद्धा बाळगून जशी कथा वाचनात येईल तशी खरी मानण्याकडे आपला कल असतो. राम हा प्रत्यक्ष ईश्वराचा अवतार अशी दृढ श्रद्धा असली म्हणजे तर्क चालवण्याची गरज राहत नाही. माझ्या मनाचा कल तसा नसल्यामुळे काही विचार, शंका वा कल्पना उभ्या राहतात.
माझ्या महाभारतावरील लेखनाप्रमाणेच या रामायणावरील लेखनातहि श्रद्धा आवश्यक तेथे दूर ठेवून, पूर्वग्रह न बाळगतां, वाचन करताना काही नवीन वा पूर्वसमजुतीपेक्षां वेगळ्या कथा वा घटना नजरेला आल्या त्याबद्दल मी लिहिणार आहे. कोणाच्याही श्रद्धा दुखवण्याचा वा त्यांचा अनादर करण्याचा अर्थातच माझा हेतु नाही, तरीहि तसे झाल्यास मी प्रथमच दिलगिरी व्यक्त करतों.
महाभारताप्रमानेच रामायणातहि अनेक उपकथानके, स्थळवर्णने, यात्रा, धार्मिक कृत्ये यांची रेलचेल आहे. काही उपकथानके दोन्ही ग्रंथांत समान आहेत, मात्रा त्याचे स्वरूप काही वेळां दोन्हीकडे एकच नाही हे लक्षात घेण्यासारखे आहे.
बालकांड हे रामायणाचे पहिले कांड. त्याचे ७७ सर्ग आहेत. त्यांत राम व त्याचे तीन बंधु यांच्या जन्मापासून त्यांच्या विवाहापर्यंत कथाभाग येतो. याबरोबरच रामाच्या कुळाची पूर्वपीठिका व इतर अनेक उपकथानके आहेत. यापुढील भागांमध्ये बालकांडाचा परामर्ष घ्यावयाचा आहे.
आपणांस हे लेखन महाभारताप्रमानेच रुचेल अशी आशा आहे.
Locations of visitors to this page