Wednesday, April 15, 2009

अयोध्याकांड - भाग ५

सर्व रात्र कैकेयीच्या विनवण्या करण्यात गेली पण कैकेयीने आपल्या मागण्या मागे घेतल्या नाहीत. संपूर्ण नाइलाज झाल्यामुळे रात्र संपल्यावर दशरथाने रामाला बोलावण्याचे ठरवले. सुमंत्र आल्यावर कैकेयीनेच त्याला पाठवून रामाला बोलावून घेतले. तो आल्यावर दशरथाला काहीच बोलवेना तेव्हां कैकेयीनेच रामाला सांगितले कीं ’ते तुला स्वत: सांगणार नाहीत पण तू ताबडतोब १४ वर्षांसाठी वनात जायचे आहेस व राज्य भरताला मिळायचे आहे.’ रामाने ताबडतोब मान्य केले व म्हटले ’मी तुझ्या आज्ञेनेच सर्वस्व त्यागीन मग राजाला कशाला त्रास दिलास?’ कैकेयीने त्यावर म्हटले कीं ’तूं खुषीने राज्य सोडून वनात गेल्याशिवाय महाराज स्नान वा भोजन करणार नाहीत.’
यापुढील प्रसंग आपणाला परिचित आहेत. सीता व लक्ष्मण रामाबरोबर वनात जाण्याचा आग्रह धरतात व राम तें मान्य करतो. कौसल्या व सुमित्रा विलाप करतात. उर्मिळेचा अजिबात उल्लेख कोठेच नाही! कौसल्येच्या तोंडी येथे एक उल्लेख येतो ’रामा तुझे उपनयन होऊन सतरा वर्षे झालीं’ यावरून यावेळी रामाचे वय २५ वर्षे व सीतेचे २०-२१ वाटते. उर्मिळा बहुधा सीतेपेक्षा थोडी लहान असावी तरी १८-१९ वर्षांची असणार, म्हणजे अजाण नव्हे. मात्र लक्ष्मणासकट कोणीच तिला काही महत्व दिले नाही. सासवांची सेवा करण्यासाठी तिला मागेच ठेवले! भरत-शत्रुघ्नांच्या बायका यावेळी नवर्‍यांबरोबर कैकय देशालाच असणार.
सुमंत्राने कैकेयीला समजावले कीं ’भरत राजा झाला तर आम्ही सर्व रामाकडे वनात जाऊं’ कैकेयीवर परिणाम शून्य. (सुमंत्र खरेतर राजाचा व राज्याचा सेवक, त्याला नवीन राजा भरत याची सेवा करणे हेच उचित!) दशरथाने सुमंत्राला म्हटले ’रामाबरोबर मोठी सेना व धनवैभव पाठवा.’ कैकेयीने ठाम विरोध केला. सुने सुने वैभवहीन राज्य तिला भरतासाठी नको होते. तिने आग्रह धरला कीं ’पूर्वी इक्ष्वाकु घराण्यातील असमंज नावाच्या राजपुत्राला दुर्गुणी निघाल्यामुळे राज्याबाहेर घालवून दिले होते तसे रामाला घालवा.’
’ही तुझी मूळची अट नव्हती’ असे दशरथ म्हणाला पण कैकेयीने तेहि मानले नाही. तिने राम व असमंज यांना एकाच पायरीला बसवले याचा वसिष्ठासकट सर्वांनाच फार राग आला. सीतेने वल्कले नेसण्याची वेळ आली तेव्हा मात्र वसिष्ठाने व दशरथाने ठाम विरोध केला. दशरथ म्हणाला कीं ’सीता माझ्या आज्ञेमुळे नव्हे तर स्वखुषीने वनात जाते आहे. तेव्हां ती सर्व वस्त्रालंकारांसकटच वनात जाईल’. (सीतेला रामाने वल्कले नेसावयास शिकविले अशी एक थाप आपले हरदास-पुराणिक मारतात, त्यांत तथ्य नाहीं!) लक्ष्मणाने वल्कले नेसल्य़ाचा उल्लेख नाही. आपल्या आईला संभाळण्याची पित्याला विनंति करून राम वनांत जाण्यास निघाला. दशरथाने सुमंत्राला त्या तिघांना वनांत सोडून येण्यास सांगितले.
या सर्व प्रसंगांत, एकदां मंथरेचा सल्ला पटल्यावर, कैकेयीने दाखवलेला मनाचा खंबीरपणा लक्षणीय आहे.

Wednesday, April 8, 2009

अयोध्याकांड - भाग ४

कैकेयीने भरताला राज्य व रामाला वनवास मागण्याचे ठरवले. इकडे अभिषेकाची तयारी करण्यास सांगून दिवस संपल्यामुळे दशरथ नेहेमीप्रमाणे कैकेयीच्या महालीं आला. रामायण म्हणते कीं राजा म्हातारा असल्यामुळे त्याला तरुण कैकेयी फार प्रिय होती! कैकेयी बेताप्रमाने रुसून बसलेली होती. तिची समजूत काढण्यासाठी ’काय हवे ते माग’ असे दशरथ म्हणाला. पूर्वी दिलेल्या वरांची आठवण देऊन कैकेयीने भरताला राज्य व रामाला १४ वर्षे वनवास, व तोही ताबडतोब, अशा मागण्या केल्या. भरताला राज्य देण्याचे दशरथाने ताबडतोब व बेलाशक मान्य केले! कैकेयीच्या पित्याला दिलेले वचन त्याच्या स्मरणात असणारच! तेव्हां ठरवल्या बेताप्रमाणे ते डावलता येत नाही असे दिसल्यावर त्याने रामाला बाजूस सारण्याचे लगेच मान्य केले. मात्र रामाबद्दल कोणतीही तक्रार नसताना वा त्याचा काही अपराध नसताना त्याला वनवासाला पाठवणे त्याने मान्य केले नाही. त्याने अनेक युक्तिवाद केले, कैकेयीच्या विनवण्या केल्या पण कैकेयीला मंथरेने दाखवून दिलेला धोका पक्का पटला होता. ती ठाम राहिली. दशरथाचे युक्तिवाद असे –
१. रामाशिवाय भरत राज्य स्वीकारणारच नाही.
२. जमलेल्या राजे लोकांना, मंत्र्यांना, जनतेला कसे सांगूं कीं कैकेयीच्या दबावामुळे मी रामाला वनवासाला पाठवतो आहे?
३. कौसल्या, सुमित्रा, सीता सर्व दु:खित होतील. मी जिवंत राहणार नाही.
४. तुला वरताना मला कळले नाहीं कीं तूंच माझ्या मृत्यूला कारण होशील.
५. रामाने वनवासाला जाण्याची आज्ञा मानली नाही तर मला आनंदच होईल पण तसे होणार नाही.
६. रामाला राज्य देण्याची घोषणा मी भर राज्यसभेत केली आहे ती कशी मोडूं?

कैकेयीने फक्त येवढेच म्हटले कीं ’तुम्ही मोठे सत्यवादी व दृढप्रतिज्ञ म्हणवता मग मी मागत असलेले वर कां देत नाही?’ रामाला वनवासाला पाठवण्याचे कारण कैकेयीने सांगितले नाही पण दशरथानेहि विचारले नाही! त्याला ते कळलेच असणार. त्याबद्दल कैकेयीचे शंकानिरसन करण्याचा प्रयत्नहि दशरथाने केला नाही. दशरथ काकुळतीला येऊन ’मी तुझे पाय धरतों’ असेहि म्हणाला पण अखेर कैकेयीने म्हटले कीं ’सत्याचे अनुकरण करा. मी माझे मागणे त्रिवार मागत आहे आणि ते मानले नाही तर मी प्राणत्याग करीन’ बोलणेच खुंटल्यामुळे दशरथाने अखेर त्राग्याने म्हटले कीं ’विवाहाचे वेळी धरलेला तुझा हात मी सोडून देतो आहे. तूं माझी कोणी नव्हेस. तूं वा भरत मला तिलांजलिही देऊं नका!’
दशरथ येवढ्या टोकाला जाऊन कठोर बोलल्यावरही कैकेयीने आपली मागणी सोडली नाही.

Wednesday, April 1, 2009

अयोध्याकांड - भाग ३

रामाच्या अभिषेकाची बातमी मंथरेकडून कळल्यावर कैकेयीला प्रथम आनंदच वाटला. त्याअर्थी ती बहुधा भोळी-भाबडी असावी. मात्र मंथरेने तिला फटकारून समजावले कीं ’तूं राणी असून तुला राजधर्मातील उग्रता समजत कशी नाही? तुझा पति समाधानासाठी तुझ्याकडे येतो पण आता कौसल्येचे हित करतो आहे. तुला कळत कसे नाही? सवतीचा पुत्र हा शत्रू असतो. भरत व राम यांचा राज्यावर सारखाच अधिकार आहे त्यामुळे रामाला भरतापासूनच भय आहे. लक्ष्मण रामभक्त तर शत्रुघ्न शेवटचा त्यामुळे त्याचा राज्यावर मुळीच अधिकार नाही. उत्पत्तिक्रमाने रामापाठोपाठ भरताचाच राज्यावर अधिकार आहे तेव्हा रामाला त्याचेच भय वाटणार आणि त्यामुळे तो तुझ्या पुत्राला क्रूरतापूर्वक वागवील. भरताला त्याची गुलामी करावी लागेल.’
कैकेयीला हे ऐकूनहि धोका कळला नाही व ती पुन्हा भाबडेपणाने मंथरेला म्हणाली ’रामानंतर १०० वर्षांनी कां होईना, भरत राजा होईलच. तूं कशाला संतापतेस? मला भरताइतकाच रामहि प्रिय आहे. रामाला राज्य मिळणार म्हणजे भरतालाच मिळाल्यासारखे मला वाटते!’ मंथरेने तिला पुन्हा समजाविले कीं ’मूर्खे, रामानंतर त्याचा पुत्रच राजा होईल आणि भरत कायमचाच बाजूला पडेल. तुला काहीच कसे कळत नाही? रामाला राज्य मिळाले तर तो भरताला बाहेरच घालवील! भरताला तू दीर्घकाळ आजोळी राहूं दिलेस त्यामुळे त्याचे नुकसान होणार आहे. तो येथेच असता तर राजाला त्याचेहि रामासारखेच प्रेम वाटले असते व त्याला अर्धे राज्य तरी मिळाले असते. शत्रुघ्नहि येथे नाही मग भरताचे हितरक्षण तुझ्याशिवाय कोण करणार? राम लक्ष्मणावर प्रेम करतो पण भरताचा तो तिरस्कार आणि द्वेष करील. तुं भरताच्या हिताचे रक्षन केले पाहिजे. ज्या कौसल्येचा तूं अनादर करतेस ती राम राजा झाला तर तुझा सूड घेईल.’
या संवादावरून दोघीच्या स्वभावावर प्रकाश पडतो व आपल्या पूर्वग्रहांना धक्का बसल्याशिवाय राहणार नाहीं. कैकेयी भोळी दिसते तर मंथराही ’अकारण’ रामाचा द्वेष करणारी नसून कैकेयी-भरताचें हितरक्षण हे आपले कर्तव्य आहे या भावनेतून तिला जाणवणारा धोका तिने कैकेयीला स्पष्टपणे दाखवून दिला आहे. राजवाड्यातील राजकारणात तिची बाजू कोणती याबाबत तिला संदेह नाही!
आता कैकेयीचे मन पालटले. दशरथाने, पूर्वी एका युद्धप्रसंगात कैकेयीने कौशल्याने व धैर्याने त्याचे सारथ्य करून त्याचा जीव वाचवला तेव्हां तिला वर दिले होते व ते कैकेयीने लगेच न मागतां राखून ठेवले होते. त्या वरांची मंथरेनेच कैकेयीला आठवण करून दिली व ’त्या वरांचा वापर करून, भरताला राज्य व रामाला चौदा वर्षे वनवास मागून घे व भरताला निष्कंटक राज्य मिळवून दे’ असे सुचवले. ’चौदा वर्षांच्या काळात भरत जनतेचे प्रेम मिळवून स्थिर होईल व रामाचा सध्याचा प्रभाव राहणार नाही’ असा दूरदृष्टीचा व रास्त सल्ला तिला दिला. दुर्योधनाने पांडवांना वनवासाला धाडताना हाच हेतु बाळगला होता याची आठवण सहजच होते. सल्ला पटला व कैकेयीचा बेत पक्का झाला. मंथरेची तिने स्तुति केली.
पुढे एका ठिकाणी उल्लेख आहे कीं दशरथाने कैकेयीशी विवाह करताना तिच्या पित्याला वचन दिले होते कीं तिच्या पुत्राला राज्य मिळेल. तोंपर्यंत कौसल्या-सुमित्रेला पुत्र नसल्यामुळे दशरथाने तसे वचन दिले होते. (महाभारतात, सत्यवतीच्या बापाने असे वचन शंतनूपाशी मागितले पण ते शंतनु देऊ शकत नव्हता कारण पुत्र देवव्रत भीष्म वयात आला होता, त्याला कसे डावलणार?) या वचनाची मंथरा वा कैकेयी दोघींनाहि माहिती नसावी कारण याप्रसंगी तसा काही उल्लेख नाही. भरताला राज्य देण्याचे वचन खरे तर जुनेच होते आणि वरांचा वापर करण्याची गरजच नव्हती. पण दशरथानेच आपले वचन पाळले नव्हते! ( रघुकुलकी रीत, जान जाय परि वचन न जाय हे खरे ठरले नव्हते!)
यापुढील कथा पुढील भागात.
Locations of visitors to this page