Monday, April 26, 2010

अरण्यकांड - भाग २

रामाने मुनींना राक्षसांपासून संरक्षण करण्याचे आश्वासन दिले होते,पण सीतेने नवव्या सर्गात असे म्हटले कीं ’आपण वनात असताना मुनिवृत्तीने रहावे, क्षात्रधर्माने वागूं नये, प्राण्यांची हिंसा करू नये व राक्षसांशीहि अकारण वैर धरूं नये. अयोध्येस परत गेल्यावर मग क्षात्रधर्माचे पालन करावे!’ मात्र रामाने हा सल्ला मानला नाही व राक्षसांचे पारिपत्य करणे हे माझे काम आहे असे बजावले. प्रत्यक्षात मात्र विराध सोडून इतर कोणाही राक्षसाशी रामाचे युद्ध झालेले नाही! विराधाने स्वत:च राम-लक्ष्मणांवर हल्ला केला होता, मुनीना त्रास दिला म्हणून त्याचे पारिपत्य केले नव्हतेच.
रामाचा प्रवास चालूच होता. वाटेत लागलेल्या पंचाप्सर नावाच्या सरोवराचे वर्णन सर्ग ११ मध्ये येते पण स्थळाचे भौगोलिक संदर्भ नाहीत त्यामुळे राम कोठवर पोचला होता याचा उलगडा होत नाही. यानंतर रामाने निरनिराळ्या मुनींच्या आश्रमांत निवास करीत दहा वर्षे काढली असा स्पष्ट उल्लेख आहे. चित्रकूट सोडल्यापासून आतापर्यंत रामाने कुटी बांधून कोठेहि वास्तव्य केलेलेच नाही! चौदा वर्षांपैकी ३-४ महिने चित्रकूटावर राहून त्यानंतर दीर्घकाळ प्रवासात व निरनिराळ्या मुनींच्या आश्रमांत व्यतीत झाला. विराध सोडून एकाही राक्षसाशी युद्ध झाले नाही. निव्वळ रामाच्या वावरामुळे राक्षसांचा उपद्रव शमला होता असे म्हणावे लागते. या दीर्घ प्रवासानंतर राम पुन्हा सुतीक्ष्णाच्या आश्रमाला आला व त्यांचा सुतीक्ष्णाने सन्मान केला.
मग रामाला अगस्त्य ऋषींना भटण्याची इच्छा झाली व सुतीक्ष्णानेहि दुजोरा देऊन जवळच चार योजनांवरील अगस्त्याच्या आश्रमाचा रस्ता सांगितला. वाटेतील अगस्त्याच्या भावालाहि भेट देऊन राम अगस्त्य मुनीना भेटला. अगस्त्यांनी रामाला अनेक आयुधे दिलीं. रामाने अगस्त्यांना विचारले कीं मी कोठे कुटी बांधावी? अगस्त्यांच्या आश्रमस्थळाचे भौगोलिक संदर्भ नाहीत पण त्याने रामाला सुचवले कीं दोन योजनांवरील पंचवटी हे स्थळ तुमच्या निवासासाठी योग्य. येथे मात्र ’गोदावरीतीराजवळील’ असा स्पष्ट भौगोलिक संदर्भ प्रथमच मिळतो. सध्याच्या पंचवटीचे गोदासान्निध्य पाहतां तीच रामायणातील पंचवटी मानतां येते. चित्रकूट ते पंचवटी एवढे दीर्घ अंतर रामाने ११-१२ वर्षे प्रवासात काटले असे दिसते मात्र प्रवास मार्ग कळत नाही. पुढे इतिहासकाळात उत्तरेकडून दक्षिणेत येण्याचा मार्ग बर्‍हाणपुरावरून खानदेशातून (मोगलकाळी) वा राजस्थान, सौराष्ट्र गुजरात असा असे. राम मध्य्भारतातून विंध्य-सातपुडा ओलांडून आला असावा.
पंचवटीच्या वाटेवर जटायु भेटला, मनुष्यवाणीने बोलला व मीहि तुमच्या आश्रयाने राहीन असे म्हणाला. तेव्हा ही एक आर्य़ांशी मैत्रीने वागणारी मानवांचीच जमात म्हटली पाहिजे.
पंचवटीवर लक्ष्मणाने कुटी बांधली. चित्रकूटावरहि त्यानेच बांधली होती. सेतू बांधायला राम इंजिनिअर होता का असा प्रश्न हल्ली केला गेला. कुटी बांधणारा लक्ष्मण बहुधा इंजिनिअर असावा ! पंचवटीवरहि रामाचे वास्तव्य ३-४ महिनेच झाले. कसे ते पुढच्या भागात पाहूं.

Saturday, April 24, 2010

अरण्यकांड - भाग १

अत्रिऋषींच्या भेटीपाशी अयोघ्याकांड संपले होते. अरण्यकांडामध्ये रामाचा तेथून पुढला वनातील प्रवास वर्णिला असून सीताहरणापर्यंत त्याचा विस्तार आहे. अत्रिऋषींच्या भेटीनंतर राम-लक्ष्मण-सीता दंडकारण्यात गेले. राक्षसांचा उपद्रव असलेल्या प्रदेशात ते बराच काळ फिरत राहिले असे म्हटले आहे. अनेक मुनींना भेटले सर्वांनी राक्षसांच्या उपद्रवाबद्दल तक्रारी करून तूं आमचे रक्षण कर असे म्हटले. रामाने ते मान्य केले. हे मुनीना सतावणारे, नरभक्षक, यज्ञाचा विध्वंस करणारे (मानव)समाज म्हणजे राक्षस ही एक वेगळीच जमात म्हटली पाहिजे. रावणालाहि राक्षस म्हटले आहे पण रावण स्वत: सुसंस्कृत, यज्ञप्रेमी व विद्वान, त्याचे अनेक मंत्री व प्रजाजनहि यज्ञ करणारे असे पुढे वर्णन केले आहे त्यांचे या जमातीशी काही नाते मानता येणार नाही. मात्र ही नरभक्षक जमात रावणाच्या अंकित होती असे दिसते व त्यांची लंकेतहि वसती असावी कारण रावणाच्या सैन्यात त्यांचा समावेश होता.
रामाची गाठ विराध नावाच्या राक्षसाशी पडली. कोणत्याही शस्त्राने न मरण्याचा वर त्याला ब्रह्मदेवाने दिला होता! तो रामाशी बोलला! कोणत्या भाषेत ते सांगितलेले नाही. आपल्या वराची माहिती त्यानेच रामाला दिली. महत्प्रयासाने राम-लक्ष्मणांनी त्याला मारले, कसे तर, एक मोठा खड्डा करून, अर्धमेला झाल्यावर त्याला गाडून टाकले. अनपेक्षित अडचणीवर युक्तीने मात केली. नरभक्षक राक्षस व राम यांचा प्रत्यक्ष संग्राम मात्र, दुसरा एकहि, पंचवटीला जाईपर्यंत वर्णिलेला नाही. विराधवधानंतर राम शरभंग मुनीच्या आश्रमास गेला. त्यानंतर पुन्हा अनेक मुनींनी राक्षसांपासून रक्षण करण्याची विनंति केली व रामाने ती मान्य केली. मुनीनी केलेल्या राक्षसांच्या अत्याचारांच्या वर्णनात तुंगभद्रा नदी व जवळचे पंपासरोवर, तसेच मंदाकिनी नदी व चित्रकूट या दोन्हीचा उल्लेख आहे. म्हणजे हा सर्वच मुलूख राक्षसांच्या उपद्रवाने ग्रस्त होता. राम मुनीना म्हणाला कीं राक्षसांच्या शासनासाठीच पित्याच्या आज्ञेने मी वनात आलो आहे. मात्र दशरथाने रामाला असा काही आदेश दिलेला नव्हता!
यानंतर हे मुनिगण व राम-लक्ष्मण सुतीक्ष्ण मुनीच्या आश्रमाला ’दुथडी वाहणार्‍या नद्या’ पार करून गेले. कोणत्या नद्या हे सांगितलेले नसल्याने सुतीक्ष्णाचा हा आश्रम कोठे होता व राम चित्रकूटापासून किती दूर वा किती दक्षिणेला आला होता हे कळत नाही. ’माझ्या निवासासाठी मी कोठे कुटी बांधावी’ असे रामाने सुतीक्ष्णाला विचारले. चित्रकूट सोडल्यापासून हा वेळपर्यंत रामाने कोठेच कुटी बांधलेली नव्हती. सुतीक्ष्णाने म्हटले कीं हा माझा आश्रमच तुमच्या निवासाला योग्य आहे. पण रामाने ते मानले नाही. एक रात्रच मुक्काम करून राम निघाला तेव्हा सुतीक्ष्णाने म्हटले कीं दंडकारण्यातील मुनींचे आश्रम पहात फिरा व नंतर पुन्हा येथे या.

Thursday, April 22, 2010

पुन्हा सुरवात

मित्रहो,
गेले दहा महिने अमेरिकेत वास्तव्य असल्यामुळे या ब्लॉगवरचे लेखन थांबले होते. आता भारतात परत आलो आहे व पुन्हा अरण्यकांडापासून नवीन लेखन सुरू करणार आहे. माझ्या पूर्वीच्या लेखनाला वाचकांचा प्रतिसाद चांगला मिळत होता. नवीन लेखनालाहि तो मिळत राहील अशी आशा आहे. लेखनाचे स्वरूप पूर्वीप्रमाणेच राहील. धन्यवाद.
प्र. के. फडणीस
Locations of visitors to this page