महाभारताप्रमाणेच रामायणाचेहि माझे वाचन मर्यादितच आहे. विदर्भ-मराठवाडा कंपनीने प्रकाशित केलेले रामायणाचे भ्हाषांतराचे पांच खंड मला वाचावयास मिळाले. त्यांत वाल्मिकि-रामायणाची मूळ कथा विद्वान संपादकांनी अभ्यासपूर्वक भाषांतर करून छापलेली आहे. त्यांचे भाषांतर अचूक आहे व उत्तम आहे असे मी गृहीत धरलेले आहे. माझा संस्कृतचा अभ्यास नसल्यामुळे तसे करण्यावाचून पर्याय नाही! रामायणाची इतर अनेक भाषांतरे व आवृत्त्या जगभर प्रसिद्ध झाल्या आहेत. रामकथेचे स्वरूप या ग्रंथांतून देशोदेशीं भाषा, काळ, लेखक, संस्कृति यानुरूप बदलत आले आहे. यांचा तौलनिक अभ्यास हे महा-विद्वानांचे काम आहे, माझे नव्हे, तेव्हां त्या भानगडीत न पडतां, मूळ वाल्मिकि रामायणाचे समोर असलेले भाषांतर आपल्याला पुरेसे आहे असे मी ठरवले.
प्रत्यक्ष रामकथा आपल्याला सर्वसाधारणपणे परिचित असते. अनेक महाकाव्यें, नाटकें, कादंबर्यांना तिने जन्म दिला आहे. साधारण्पणे श्रद्धा बाळगून जशी कथा वाचनात येईल तशी खरी मानण्याकडे आपला कल असतो. राम हा प्रत्यक्ष ईश्वराचा अवतार अशी दृढ श्रद्धा असली म्हणजे तर्क चालवण्याची गरज राहत नाही. माझ्या मनाचा कल तसा नसल्यामुळे काही विचार, शंका वा कल्पना उभ्या राहतात.
माझ्या महाभारतावरील लेखनाप्रमाणेच या रामायणावरील लेखनातहि श्रद्धा आवश्यक तेथे दूर ठेवून, पूर्वग्रह न बाळगतां, वाचन करताना काही नवीन वा पूर्वसमजुतीपेक्षां वेगळ्या कथा वा घटना नजरेला आल्या त्याबद्दल मी लिहिणार आहे. कोणाच्याही श्रद्धा दुखवण्याचा वा त्यांचा अनादर करण्याचा अर्थातच माझा हेतु नाही, तरीहि तसे झाल्यास मी प्रथमच दिलगिरी व्यक्त करतों.
महाभारताप्रमानेच रामायणातहि अनेक उपकथानके, स्थळवर्णने, यात्रा, धार्मिक कृत्ये यांची रेलचेल आहे. काही उपकथानके दोन्ही ग्रंथांत समान आहेत, मात्रा त्याचे स्वरूप काही वेळां दोन्हीकडे एकच नाही हे लक्षात घेण्यासारखे आहे.
बालकांड हे रामायणाचे पहिले कांड. त्याचे ७७ सर्ग आहेत. त्यांत राम व त्याचे तीन बंधु यांच्या जन्मापासून त्यांच्या विवाहापर्यंत कथाभाग येतो. याबरोबरच रामाच्या कुळाची पूर्वपीठिका व इतर अनेक उपकथानके आहेत. यापुढील भागांमध्ये बालकांडाचा परामर्ष घ्यावयाचा आहे.
आपणांस हे लेखन महाभारताप्रमानेच रुचेल अशी आशा आहे.
Tuesday, January 6, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment