Friday, January 30, 2009

रामायण बालकांड - भाग ६

चौघा राजपुत्रांचे बालपण संपण्याच्या सुमारासच विश्वामित्र ऋषि दशरथाकडे आले व यज्ञाला उपद्रव देणार्‍या मारीच सुबाहु वगैरे राक्षसांचा प्रतिकार करण्यासाठी त्यांनी रामाची मागणी केली. दशरथ स्वत: एक अक्षौहिणी सैन्य घेऊन मदतीस जाण्यास तयार होता पण विश्वामित्राला रामच हवा होता. वसिष्ठांनी विश्वामित्रांचा सर्व महिमा सांगून त्यांचा हवाला दशरथाला दिला व मग राम-लक्ष्मण विश्वामित्राबरोबर गेले. यावेळी भरत कोठे होता? रामाबरोबर जाण्यासाठी त्याचे नाव पुढे आले नाही. तो कदाचित आजोळी असावा. राम-लक्ष्मण यावेळी १५-१६ वर्षांचे होते. राम अजून १६ वर्षांचाहि झालेला नाही असे दशरथच विश्वामित्राला म्हणाला होता.
यज्ञाला त्रास देणारा मारीच हा सुंद व ताटकेचा पुत्र. सुबाहु हा उपसुंदाचा पुत्र पण ताटकेचा पुत्र असा स्पष्ट उल्लेख नाही. सुंद-उपसुंद हे मोहिनीच्या मोहात पडले व आपसात लढून मेले पण त्याना त्यापूर्वी ताटकेपासून पुत्र झाले होते असे दिसते. ताटका स्वत: सुकेतु यक्षाची कन्या. मग या सर्वांची गणना राक्षसांत कां होते? यज्ञसंस्कृति न मानणारे ते राक्षस असे म्हणावे तर राक्षसराज रावण हा स्वत: यज्ञ करीत असे! अगस्तीच्या शापाने मारीच-सुबाहु राक्षस झाले असे म्हटले आहे. त्यांच्या वर्तणुकीमुळे त्यांची राक्षसांत गणना होत असावी. रामायणातील राक्षस व वानर कोण हे एक न उलगडणारे कोडे आहे. वानर इतरत्र कोठेहि नाहीत. राक्षस मात्र सर्वत्र असतात पण त्यांचे जन्म क्षत्रिय वा ब्राह्मण कुळांत असतात. त्यांच्या मनोवृत्ति वा वर्तणुकीमुळे त्यांची गणना राक्षसांत होत असावी. उदा. रावण, जरासंध वा कंस.
यानंतर येणारी ताटकावधाची, सगर/भगीरथांची व समुद्रमंथनाची कथा मी बाजूस ठेवणार आहे. भगीरथाने गंगा भूमीवर आणणे हे एक रूपक आहे व गंगेचे खोरे शेतीखाली आणण्याशी त्याचा संबंध असावा असा माझा तर्क आहे. समुद्रमंथन कथेमध्ये एक गमतीचा उल्लेख मिळाला. समुद्रमंथनातून बाहेर आलेली सुरा, म्हणजे दारू, ही देवांनी पळवली, राक्षसांनी नव्हे! सुरा पिणारे ते सुर व न पिणारे ते असुर असे चक्क म्हटले आहे! तेव्हा आपणाला असुर म्हणवून घ्यावयाचे नसेल तर सुरा प्यावी लागेल! पहा बुवा!
यापुढील प्रसंग पुढील भागात.

3 comments:

  1. >>आपणाला असुर म्हणवून घ्यावयाचे नसेल तर सुरा प्यावी लागेल! पहा बुवा!

    LOL!!

    ReplyDelete
  2. मी कधीकधी थोडीफार सुरा पितो त्यामुळे माझी असुरांत गणना करूं नये ही विनंति.

    ReplyDelete
  3. कधीतरी असे वाचनात आले होते, की उत्तरेकडून जे आले ते आर्य. आणि जे मूळ दक्षिणेत वास करणारे होते, (द्रविड) अनार्य, ह्यांना राक्षस म्हणाले जाऊ लागले असावे. आर्यपुत्र राम जिंकला त्यामुळे इतिहासाला रामस्तुतीचा संसर्ग झाला असावा. कारण इतिहास नेहमीच जेत्यांच्या वाणीने बोलतो. असो हे सर्व तर्क आहेत. पण राक्षस ह्या शब्दाची उत्पत्तीच मुली 'रक्ष' म्हणजे रक्षण करणारा अश्या शब्दापासून झाली असावी असे मला वाटते !

    ReplyDelete

Locations of visitors to this page