Thursday, June 11, 2009

अयोध्याकांड - भाग ७

रामाने निरोप दिल्यावर सुमंत्र गुहकाजवळ, राम कदाचित बोलावील या आशेने काही दिवस थांबून राहिला होता. राम भरद्वाज आश्रमाला पोचल्याची बातमी गुहकाच्या हेरांनी सांगितल्यावर निराश होऊन तो अयोध्येला परत गेला. तो रामाशिवायच परत आलेला पाहून राम खरेच वनात गेला अशी खात्री होऊन दशरथ मूर्च्छित झाला. मग ’मला रामाकडे ने’ असे सुमंत्राला विनवू लागला. राम वनात जाऊन पांच रात्री उलटल्या असे यावेळी कौसल्या म्हणाली यावरून सुमंत्र गुहकापाशी एखददुसराच दिवस राहिला असावा. दशरथ, कौसल्या शोकमग्न झालीं. दशरथाने यावेळी श्रावणाची कथा सांगून त्याच्या पित्याचा शाप मला भोवतो आहे असे म्हटले. मात्र श्रावणाचा जन्म वैश्य पिता व शूद्र माता यांचेपासून असल्याचे दशरथ म्हणाला. हा खुलासा मुद्दाम करण्याचे कारण दशरथाला ब्रह्महत्येचे पातक लागलेले नव्हते हे स्पष्ट करणे हेच असावे. त्यामुळे दशरथाचा गुन्हा थोडा सौम्य ठरला! विलाप करीतच मध्यरात्री दशरथ मरण पावला. हा प्रसंग कौसल्येच्या महालात घडला व सुमित्राही तेथेच होती पण कैकेयीचा उल्लेख नाही. कौसल्या, सुमित्रा अर्धवट शुद्धीत होत्या त्याना दशरथ मेल्याचे कळलेहि नाही. जणू तो बेवारशासारखा मरण पावला! कैकेयीला काहीच कळले नव्हते. दुसरे दिवशी राण्या, मंत्री, वसिष्ठमुनि, प्रजाजन सर्व शोकमग्न झाले. एकहि पुत्र जवळ नसल्याने दशरथाचे शव तेलाने भरलेल्या द्रोणीत ठेवले. (आजकाल मॉर्गमध्ये ठेवतात तसे!). मार्कंडेय ऋषीनी वसिष्ठाना म्हटले की कोणाही राजवंशातील व्यक्तीला अभिषेक करा. तें न मानून वसिष्ठाने पांच दूत भरताकडे शीघ्र पाठवले. यापुढील हकिगत पुढील भागात पाहूं.

2 comments:

  1. वाचते आहे काका. पुढील भाग लवकर टाका.

    ReplyDelete

Locations of visitors to this page